शुक्रवार, 26 जून 2020

शिवनेरीवरील बौद्ध लेणी






छत्रपति शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला जुन्नरचा शिवनेरी किल्ला हा सर्वांच्या परिचयाचा.
पण याच शिवनेरी किल्ल्यावर ६० बुद्ध लेणी आहेत.भारतातील सर्वात जास्त लेणी या महाराष्ट्रात आहेत,महाराष्ट्रातील सर्वात जास्त लेणी या एकट्या जुन्नर तालुक्या मधे आहेत आणि शिवनेरी किल्ल्यावर जुन्नर तालुक्यातील सर्वात जास्त लेणी आपल्याला पहायला मिळतात.
आज आपण शिवनेरी किल्ल्याच्या पुर्वे कडील बाजुच्या साखळ दंडाच्या जवळच्या लेणीची माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रातुन शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात परंतु खुप कमी असे पर्यटक आहेत की जे साखळदंड़ाच्या मार्गाने किल्ल्यावर जातात.लेणी वर जाण्यासाठी खाली साखळदंड ज्या मार्गाने आहे त्या मार्गावर दिशा दर्शक बाण दाखवले आहेत.साधारणता १ तासाची चढाई केल्यावर आपण साखळदंड आहे त्याठीकाणी येउन पोहचतो. त्या इथे एक मोठा लेणी समुह आपल्याला पहायला मिळतो. शिवनेरी गडावर वरती ज्या मोठ्या प्रमाणात पाण्याच्या टाक्या कोरलेल्या दिसतात त्याच प्रमाने या लेणीच्या समोरच पाण्याची टाकी आहे.उन्हाळ्यात सुद्धा या टाक्यां मधे मुबलक प्रमाणात पाणी साठा उपलब्ध आहे यावरून आपण त्याकाळातील जलव्यवस्थापन हे किती उत्तम होते याची जाणीव होते.या टाकी जवलच एक सुंदर लेण आहे,लेणी द्वारा वर सुंदर असे नक्षी काम कोरलेले आहे
आत मधे बौद्ध भिक्खुंसाठी साधना करण्या साठी शैलगृह आहेत. लेणी द्वाराच्या बाजुला अप्रतिम अशी खिड़की कोरलेली आहे. बेडसे लेणी मध्ये पण आपल्याला सुंदर खिड़की पहायला भेटते. या लेणी समुहातिल बहुतेक लेणी या अर्धवट कोरलेल्या दिसतात. या लेणीच्या खालच्या बाजुने पुढे पायवाटेने १५ मिनट चालत गेल्यावर  दुसरा एक मोठा लेणी समुह बघन्यास मिळतो.या लेणी मधे एक मोठे चैत्यगृह कोरलेले आहे. चैत्यगृहाच्या प्रवेश भिंतीवर दोन्ही बाजुला खिडक्या कोरलेल्या आहेत. तसेच प्रवेश द्वाराच्या इथे पायऱ्या सुद्धा आहेत. या लेणीच्या उजव्या बाजुच्या भिंतीवर एक पाली भाषेतील ब्राम्ही लिपितिल शिलालेख कोरलेला आहे.या लेणी साठी कोणी दान दिले याचा उल्लेख त्यात आहे. लेणी प्रवेशद्वारा समोरच्या छताला दोन हजार वर्षां पुर्वीचे रंगकाम केलेले आढळते.आज ते रंगकाम शेवटची घटका मोजत आहेत परंतु जेवढे शिल्लक आहे ते ज्या वेळेस आपण पाहतो तर असे वाटते की आताच कोणि तरी काचेवर रंग काम केले आहे एवढी चकाकी आजही त्या कलेत दिसते. विचार मनात येतो की ज्या वेळेस ते रंगकाम केले गेले असेल त्याचे सौंदर्य किती अप्रतिम असेल.चैत्यगृहा मधे प्रवेश केल्यावर चार खांब दिसतात. आत मधे एक भव्य असा परिपुर्ण चैत्यस्तुप दिसतो,हे चैत्यगृह चौकोनी आहे. याच्या छतालाही रंगकाम केलेले होते,आज त्यातील थोडेच रंगकाम शिल्लक आहे.याची चकाकी सुद्धा अप्रतिम आहे. स्तुपाचा आकार हा खुप भव्य आहे. या स्तुपाला हर्मिका आणि दगडात कोरलेली छत्री सुद्धा आहे की जी छताला जोड़लेली आहे.या स्तुपाची पुजा जेव्हा बौद्ध भीक्खु आणि उपासक करत असतील तेव्हा येथील वातावरण खुप धम्ममय होत असेल यात शंका नाही. बुद्ध स्तुपाच्या सानिध्यात एक विलक्षण शांती अनुभवयास मिळते.या चैत्यगृहा समोर पाहिले असता विस्तीर्ण असा जुन्नरचा परिसर दृष्टीक्षेपात पडतो.अंबा अंबिका लेणी समुह सुद्धा याठीकाना वरून दिसतो.
वंदामी चेतियं सब्ब सब्ब ठानेसु पतीठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्ध रूपं सकल सदा.
हे चैत्य स्तुपाचे सुर हजारो वर्ष या लेणींमधुन दुमदुमत असतील आणि संपुर्ण भुतलावरील प्राणी हर्षाने उल्हासित होत असतील यात तीळ मात्र शंका नाही.

या चैत्यगृहाच्या बाजुला शैलगृह कोरलेले आहेत.यात दर्शनी भिंतीवर स्तुप कोरलेला आहे याच्या छतालाही रंगकाम केलेल्याच्या खुणा आजही आपल्याला दिसतात. या लेणीच्या बाजुला काही पायऱ्या कोरलेल्या आहेत. आजच्या आधुनिक काळात ज्या प्रमाणे एका मजल्यावरुन दुसऱ्या मजल्यावर जाण्या साठी जीना असतो त्याच प्रमाणे एक जीना कोरलेला दिसतो या जिन्यातुन वरती गेल्यावर आपल्याला एक भव्य लेणी दिसते या लेणीला व्हरंडा आहे दुमजली असलेल्या या लेणी मधुन समोरचे दृश्य अप्रतिम दिसते.
सम्राट अशोक यांनी बुद्ध अस्थि धातुंवर संपुर्ण जंबुद्वीपात ८४००० स्तुप बांधले.स्तुप हे बुद्ध प्रतीक आहे. बुद्ध प्रतीक पुढील प्रमाने होत बोधिवृक्ष,सिरिपाद,स्तुप. बोधिवृक्ष आपल्याला अंबाअंबिका लेणी समुहातिल भुत लेणीच्या प्रवेशद्वारा वर कोरलेले दिसते,तसेच बुद्ध,धम्म,संघ या तीन रत्नांचे त्रिरत्न चिन्ह सुद्धा भुत लेणी मध्ये, अंबा अंबिका लेणी मधे कोरलेल्या शिलालेखाच्या सुरुवातीला तसेच लेन्याद्रिच्या मुख्य स्तुपाच्या हर्मिकेवर कोरलेले आपल्याला पहायला भेटते. एवढ्या विपुल प्रमाणात जुन्नर मधे लेणी आहेत की यावरून आपन हा अनुमान लावतो की दोन हजार वर्षांपुर्वी किती विपुल प्रमाणात भिक्खु संघ येथे वास्तव्य करत असेल आणि त्यांना दान देणारे उपासकही येथे मोठ्या प्रमाणात असतील.
संपुर्ण जंबुद्वीपावर बुद्धांच्या धम्माचे राज होते हे आपल्याला ठाउक आहे.
बुद्धं सरणं गच्छामि
धम्मं सरणं गच्छामि
संघं सरणं गच्छामि
हा ध्वनि हजारो वर्ष या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात दुमदुमत असेल. लाखो अनुयायी बुद्धाने सांगितलेल्या धम्म मार्गावर आपले जीवन व्यतीत करत आले आहेत.
हा बुद्धांचा धम्म जनमाणसा पर्यंत पोहचवन्याचे प्रमुख केंद्र या लेणी होत्या. हजारो वर्षां पासुन या बुद्धाच्या भारत भुमिला भेट देण्यासाठी अनेक राजे,उपासक येत होते,येत आहेत आणि भविष्यातही येत राहतील.

* * *     सौजन्य : व्हाटसप

सोमवार, 22 जून 2020

चौक आणि चौकट


Add captioअनंत खासबारदारn
                           






















लालसर रंगाच्या पार्श्वभूमीवर एक काळ्या रंगाचा गरुड, त्याखाली एक चौरस त्यात हिरवा, लाल, जांभळा अशा रंगांच्या छटा, फटकारे... काहीसं अब्स्ट्रॅक्ट .. पांढऱ्या व काळ्या अक्षरात पुस्तकाचं शीर्षक.. ' चौक आणि चौकट '. प्रसिद्ध चित्रकार सुभाष अवचट आणि त्यांचाच ब्लर्ब.. आणि कवी म्हणजे चक्क जाहिरात क्षेत्रातले मोठे नाव,कमर्शियल आर्टिस्ट अनंत खासबारदार...!ज्यांनी 'स्वच्छ भारत अभियान'चा लोगो बनवला, भालचंद्र नेमाडे यांच्या 'चांगदेव चतुष्ट्य' ची मुखपृष्ठं बनवली असे प्रतिभावंत चित्रकार..
     पॉप्युलर या विख्यात प्रकाशनसंस्थेने काढलेल्या या संग्रहात एकूण १०८ पृष्ठे व तितक्याच कविता आहेत. राष्ट्राला अर्पण केलेल्या या संग्रहात दुसऱ्याच पानावर
    
       निसटून जातो जसा पारा
       तसा जगलो रोज इथे
       झूल रोज नवीच तरीही
       मागत गेलो दान इथे
या ओळी आपले लक्ष वेधून घेतात आणि एकूणच कवितांची जातकुळी लक्षात येते. जगणेच पाऱ्यासारखे असल्याने ते शब्दात पकडणे अशक्यच.. जगताना पांघराव्या लागलेल्या  झूली रोज नव्याच असल्या तरी दान मागणे जुनेच आहे. वेगवेगळ्या भूमिका निभावताना साकल्य आणि साफल्याचे दान मागत राहण्याचे भागधेय ठरुन गेले आहे. आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधणारी, आत्मशोधाच्या वाटेने जाणारी ही कविता आहे.
हा अर्थ लावताना वारशात  मिळालेल्या संचितांचा अन्वय लावताना 'त्या ' शक्तीशी संवाद होतो.. एवढे सगळे असूनही ओढ लागली आहे ती हव्यासपलीकडचे मिळवण्याची.. त्यामुळे साधने हाताशी असूनही काहीच सापडत नाही अशी अवस्था झाली आहे, हे सांगताना कवी प्रार्थना करतात -

       आता जे हवंय, हव्यासापलीकडचं
       तेही तूच दे...
       या पसाऱ्यात हरवलेली एक जागा;
       तुला भेटण्याची... शांतपणे (पृ.१)
  जगाच्या पाठीवर अगतिक, दुर्बल जीव आढळतात. पाण्याअभावी सुकलेले झाड ; तहानलेले जीव;पाणी ताब्यात असलेल्या बलदंड आसाम्या;चिरडले जाणारे चिमुकलो जीव;रुग्ण शय्येवरच्या अगतिक रुग्ण आणि ज्यांच्यासाठी आपण परके आहोत अशा सर्वसामान्यांसाठी कवी प्रार्थना करतात. ज्यांच्यासाठी प्रार्थना करणारे कुणीच उरलेले नाही अशा सर्वांसाठी काहीच करता येत नसेल तर किमान प्रार्थना  करायची बांधिलकी मानणारा हा कवी आहे. संवेदनशीलता कमी झाल्याचे शल्य घेऊन, संवेदनांच्या काहूरात कवीने ' मी त्यांच्यासाठी प्रार्थना करेन ' ही कविता लिहिली असल्याचे जाणवते...
     ' जळालेले मंत्रालय ' ही कविता मागच्या शासनाच्या काळात मंत्रालयाला लागलेल्या आगीवरचे राजकीय परंतु  भाष्य आहे -
     जळालेल्या त्या साऱ्या फाइल्समधून एक कागद वाचला होता...
     दूरवरच्या खेडेगावातून आलेला एक अर्ज तेवढा
  उरला होता....
  जळून गेलेल्या मुलीच्या खुनाची तक्रार..
  किंवा पोट जाळता जाळता रस्त्याकडेला अपघातात
  गेलेल्या म्हाताऱ्याचा तपास,
  गावाबाहेर जळालेल्या वस्तीतले आक्रोश,
  आणि फटाक्यांच्या फॅक्टरीच्या आगीत होरपळलेलं बालपण...
  वणव्यात भस्मसात झालेल्या अधिकाऱ्यांच्या कहाण्या...
  आणि पेट्रोल माफियांनी जाळलेले देह,
  कोणता तरी एक अर्ज जिवंत होता..
  मंत्रालयावर नुकत्याच लावलेल्या राजमुद्रेतील
  एक सिंह दुःखी होता..
  द्दष्टी अधू असल्याने त्याने वाचला तो अर्ज...
  अन् भिंतीवरची अक्षरं वरुन उलटी...
  सत्यमेव जळते !

सामाजिक विषमता आणि राजकीय अनास्था यावरची सणसणीत चपराक खासबारदार ताकदीने लगावतात.
     " त्या पहाटे ' या कवितेत पहाटेच्या तरलपणा सोबत एकाकीपणा ते चित्रित करतात. परस्परविरोधी मानसिक आंदोलनांना कवी खासबारदार खुबीने चितारतात. म्हणजे त्यांच्या कवितेत एकाच वेळी संवाद लय आणि विरोध लय आढळते. कधी हा संवाद स्वतःचा स्वतःशी तर कधी समष्टीशी चालू असतो. विरोध लय साकारताना ते स्वतःची अगतिकता भोवतालच्या कडूझार वास्तवाच्या पार्श्वभूमीवर मांडतात. सभोवतालचे दैन्य, दुःख, विपरीत वास्तव त्यांच्या संवेदनशील मनावर चरे उमटवते. या दृष्टीने त्यांच्या 'भुकेचा  श्लोक, ' ' वादळ भोवरा ' , ' दुःखाचे हुंकार ' , ' जुना डाग ' , 'दुष्काळ ' , 'स्तवनदरबारी ', 'काँक्रीट जंगलात ' , 'चिंता आणि चिता','मोनालिसा', ' प्रहर ' अशा अनेक कविता दाखवता येतात.
     ते चित्रकार असल्याने त्यांच्या कवितेतही हे रंग शब्दांच्या सोबत येतात. उदा. कविता व त्यातील रंग -
     प्रार्थना - शुभ्र
     शाप - आकाशी
     जळालेले मंत्रालय - आग (नारंगी, पिवळा, लाल )
     त्या पहाटे - शुभ्र
     रंग - इंद्रधनुषी
     सैरभैर - पांढरा, काळा, कर्दळी
     भुकेचा श्लोक - पांढरा
     काय करु -हिरवा
     आठवणींचा नाग व शाई सती जाताना - शाई
     कारखाना - लाल,निळसर व कळकट
     
      ' रंगीत सूज ' या कवितेत तर रंग आणि सेलिब्रेटींचा संबंध उलगडून दाखवला आहे. खासबारदार यांच्यातला चित्रकार दिसतो तो असा..
      त्याचप्रमाणे कवीच्या अभिव्यक्तीचे दोन स्तर दाखवता येतात. एक जनभाषेचा स्तर तर दुसरा सूचकतेचा स्तर. जनभाषेच्या स्तरातील अभिव्यक्ती ही सर्वसामान्यांच्या भाषेत थेटपणे होते.तर सूचकतेच्या स्तरातील कविता प्रसंगी  भयसूचन तर अर्थाच्या अनेक शक्यता अधोरेखित करताना दिसतात.पहिल्या प्रकारच्या कवितांमध्ये 'सूर्य राहू दे तरी ','हजार पावलांवर','काय करू', 'बायोडेटा','कारण..राजकारण..'सारख्या कविता दाखवता येतात.



कालच्या दि. २१ जून च्या मटाच्या अंकात हा लेख 

गुरुवार, 18 जून 2020

पेमगिरी येथील विशाल वटवृक्ष


        आशिया खंडातील दोन नंबरचा विशाल वटवृक्ष

   ' नेर ' या शब्दाचा अर्थ होतो 'गांव '. अहमदनगर जिल्हयातील 'संगमनेर ' या तालुक्याच्या गावाच्या नावाचा अर्थ होतो - संगमावरील गाव. हे तालुक्या चे गाव प्रवरा आणि म्हाळुंगी या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.
   या तालुक्यातील पेमगिरी हे ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे गाव आहे. डोंगरदऱ्यांतून वाहणारे निर्झर आणि घनदाट वनराईमुळे गावाच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. ऐतिहासिक

पेमगिरी किल्ला आणि महाकाय वटवृक्ष हा पेमगिरीकरांचा अमूल्य ठेवा आहे. भारतातील सर्वात मोठे वडाचे झाड कोलकात्याला आहे. त्यानंतर पेमगिरीच्या वटवृक्षाचा क्रमांक लागतो. सुमारे अडीच ते तीन एकरांच्या परिसरात या झाडाचा विस्तार झाला आहे. वाढलेल्या झाडाच्या पारंब्या जमिनीला टेकल्या, की त्यालाच मुळे फुटून नवीन झाड जन्म घेते. अशा शेकडो पारंब्या जमिनीत रुजून हा विशाल वटवृक्ष वर्षांनुवर्षे दिमाखात उभा आहे.

  
झाडात झाड वडाचे झाड! हा वंश वटवृक्ष. वंशवृद्धीसाठी या झाडाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, इतकेच नव्हे तर, या झाडापासून वातावरणात पसरणारी शक्‍ती व वायू यांचा शरीरावर परिणाम होतो म्हणूनही काही संस्कार-व्रते प्रचलित आहेत. सध्या हिरवळीचे खूप महत्त्व आहे. बागबगीचे, जंगले वाढवावीत असा खूप प्रचारही होतो आहे. परंतु लोकांच्या मनात झाडाच्या श्रेष्ठतेविषयी श्रद्धा वाढल्याशिवाय या उपक्रमाला खरी साथ मिळणे अवघड राहील. वटपौर्णिमेच्या पूजेसारखे उत्सव ( पण पुराणातले चमत्कार टाळून ) वैज्ञानिक पद्धतीने याचा प्रचार करून अवश्‍य वाढवावेत व पर्यावरणरक्षणाला मदत करावी. वड म्हणजे फायकस या प्रजातीत मोडणारी फायकस बेंगालेन्सिस नावाची जात आहे. अतिविशाल, प्रचंड विस्ताराचा हा वृक्ष सर्वसाधारणपणे १५ ते २० मीटर उंच वाढतो. याच्या फांद्यांना फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोचतात. त्यांना पारंब्या म्हणतात. जमिनीपर्यंत पोचल्यावर या पारंब्यांना खोडांचा आकार येऊ लागतो व त्यातूनच झाडाच्या मुख्य खोडाभोवती बनलेल्या इतर खोडांचा विस्तार होत जातो. पारंब्या वरून खाली येतात म्हणून या वृक्षाला ‘न्यग्रोध’ असेही नाव आहे.


गवताची व दर्भाची पाती असोत, जंगलातील दोनदोनशे फूट वाढणारी झाडे असोत, झाडाच्या खोडातून अख्खी मोटर जाऊ शकेल एवढे मोठे खोड असलेली झाडे असोत किंवा वटवृक्षासारखे झाड असो, एकूण प्राणिमात्राची व जिवाची उत्क्रांती वनस्पतीपासून होते. वनस्पतीतील उत्क्रांती वडाच्या झाडाच्या ठिकाणी पूर्ण झाली. पुढे सजीव, हिंडणारे-फिरणारे प्राणी सुरू होतील असे हे पूर्णत्व सुचविणारे वडाचे झाड. 

वनस्पती सजीव असतात व त्यांच्यात प्राण असतो, पण त्या एकाच जागी राहतात. प्राण कार्यान्वित होऊन भूमीपासून अलग होणारे किंवा एका स्थानाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारे प्राणी उत्क्रांत झाले याची गोष्ट समजावी म्हणून की काय, सावित्रीने वडाच्या झाडाखाली पूजा करून आपल्या पतीला प्राण देऊन जिवंत केले ही कथा प्रचलित असावी. 

वडाचे झाड आयुर्वेदात खूप महत्त्वाचे मानले गेलेले आहे. साल, मुळ्या, पारंब्या वगैरे वटवृक्षाच्या सर्व भागांचा उपयोग होतो. जीवनचक्र सुरू राहण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या पुनरुत्पत्तीसाठी वडाच्या झाडाचा खूप उपयोग होतो. नवांकुरांचा रस नाकात टाकायचा असो, एकूणच वीर्य वाढविण्यासाठी असो किंवा गर्भाशयाच्या शुद्धीसाठी असो, वडाच्या झाडाचा उपयोग होतोच. 

वडाच्या झाडाची एक गंमत अशी की ते लावावे लागत नाही. ते कुठे, कसे व केव्हा उगवेल हे सांगता येत नाही. वनस्पती लावा, हिरवळ लावा, वृक्षतोड थांबवा, सेंद्रिय शेती करा, अमुक खत वापरा, तमुक खत वापरू नका, जमिनीची मशागत अशी करा, अमुक प्रकारचे बियाणे वापरा असा खूप प्रचार झाला व त्याचे शिक्षण दिले तरी झाडे वाढवता येतीलच असे नाही. त्या उलट अचानक घराच्या भिंतीतून एक वडाचे झाड उगवलेले दिसते. वडाच्या झाडाची एक काडी नव्हे तर एक पान जरी जमिनीत खोवले तरी त्याचा वृक्ष होतो असे म्हणतात. 

शेजारच्याच्या व आपल्या शेतजमिनीच्या सीमा नीट कळाव्यात म्हणून बांधावर वडाच्या फांद्या खोचल्या जातात. वडा-पांगाऱ्याच्या सरळ काड्या वापरून भाजीपाल्यासाठी लागणारा सुंदर मांडव उभारता येतो, शिवाय ह्या कामाला एक पैसाही खर्च होत नाही. मांडव उभारताना काड्या एकमेकाला बांधण्यासाठी वडाच्या पातळ पारंब्या उपयोगाला येतात. लावलेल्या वाळक्‍या काड्यांना पाने फुटून पुढे मोठी झाडे झालेलीही दिसतात.  

पेमगिरीच्या वडाच्या पायथ्याशी गावकऱ्यांनी जाखमतबाबा,जाखाई यांच्या  मूर्ती  आहेत. त्यामागे एक कथा आहे त्यामुर्ती मध्ये जाखमतबाबा, त्याची बहीण जाखाई,एक वाघ व एक कुत्रा आहे.  गावकऱ्यांच्या तोंडून ऐकलं तर असं कळत की, "एकदा जाखमतबाबा तो शेळ्या चरायला न्यायचा तेव्हा त्याची शेळी वाघाने पकडली म्हणून त्या बाबाने त्या वाघाला ललकारलं त्यामुळे त्याच्यावर वाघाने हल्ला केला तेव्हा त्या जाखमतबाबाने आपल्या हातातली कुऱ्हाड वाघाच्या डोक्यात घातली अशी त्यांची झटापट पेमगिरी गडावरून खालपर्यंत येऊन थांबली तेव्हा सोबत असलेला कुत्रा त्या वाघाचे लचके तोडत होता संध्याकाळची वेळ असल्याने त्या जाखमतबाबाची बहीण जाखाई त्याला शोधत निघाली असता रक्ताच्या डागावरून ती वडापर्यंत येऊन पोचली व तिला दिसलं की भाऊ मृत्यमुखी पडला आहे तिला दुःख अनावर झालं आणि तिने हातातला पाण्याचा गडवा डोक्यात मारून स्वतः स्वतः प्राण सोडला" अशी कहाणी ह्या मूर्तीची. म्हणून आजही ह्या वडाखाली असलेल्या ह्या मूर्तीची लोक मनोभावे पूजा करतात. 

    भारतातील काही शहरांत प्राचीन आणि विस्तीर्ण असे वडाचे वृक्ष आढळतात. मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात वडचिंचोली येथे एक वटवृक्ष अडीच एकर भूमीवर पसरलेला आहे. बिहारमधील कमिटीत गावातील वृक्ष, गुजराथमधील नर्मदेच्या मुखाजवळील कबीरवट, कलकत्त्याच्या शिवफूट बोटॅनिकल गार्डनमधील पसरलेला वड प्रचंड असून त्यांच्या छायेत चार पाच हजार लोक बसू शकतात. शिवफूट वनस्पती उद्यानातल्या वटवृक्षाचे वय ३५० वर्षे आहे. मद्रास येथील अड्यारच्या थिऑसॉफिकल सोसायटी येथे आणि सातारा शहराजवळ असेच वडाचे प्राचीन वृक्ष आहेत. तसेच पातूरजवळ असलेल्या अंबाशी येथील गावात असलेला वटवृक्षही सुमारे दिड एकर परिसरात पसरलेला आहे.
    मात्र पेमगिरी येथील हा विशाल वटवृक्ष तीन एकरात पसरलेला असून त्याच्या अजून काही पारंब्या जमिनीला टेकून खोड बनण्याची प्रक्रिया चालू आहे. ज्यांच्या जमिनीत हा वृक्ष आहे त्यांनी आपले उर्वरित शेत आता या वडासाठीच राखून ठेवले आहे.
    संगमनेर पासून २४ कि मी अंतरावर हा वटवृक्ष आहे. शहाजीराजे, बाजीराव मस्तानीच्या वास्तव्याने प्रेरित झालेला प्रेमगड उर्फ शहागड उर्फ पेमगिरी च्या किल्ल्याच्या मागे हा सुमारे दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वीचा वड आहे. या वडाच्या बाजूलाच मोरदरा आहे.सीताफळाची विपुल झाडे असणारा हा परिसर आवर्जून पहावा असाच आहे.

- डॉ.सं ज य  बो रु डे,
२१ अ , अमन, गोविंदपुरा, एकता कॉलनी, अहमदनगर,४१४००१.
मो.९४०५००० २८०
   


मंगलवार, 16 जून 2020

मी कुणी 'वेगळी ' नाही ! : सोनाझरिया मिंझ

मी कुणी 'वेगळी ' नाही !
: सोनाझरिया मिंझ




या मुळच्या झारखंडच्या . दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विदयापीठात ' कॉम्प्युटर अॅण्ड सिस्टीम सायन्स ' च्या प्रोफेसर . नुकतीच त्यांची झारखंडमधील ' 'सिधो कान्हो मूर्मू ' या विद्यापीठाच्या कुलगुरु म्हणून निवड झाली आहे . या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्याच महिला आदिवासी आहेत . या सन्माननीय नियुक्ती निमित्तानं त्यांच्या मनोगताचा हा पुर्वार्ध* 

एक आदिवासी महिला ही माझी ओळख आहे आणि अस्मिता, अभिमानही.मी आदिवासी आहे म्हणून इतरांपेक्षा वेगळी, विशेष होते असं मी कधीही मानलं नाही . उलट मी इतर सर्वांसारखीच होते आणि आहे . हे सर्वांना जमत, करता येतं ते मलाही जमायला हवं, हा माझा स्वतःविषयी हट्ट  आहे . हा विश्वास उराशी जपतच मी कुलगुरू या पदापर्यंत पोहोचले आहे .
     रांचीमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालं .ती खास खासगी मिशनरी मुलींची शाळा होती. तिथे ७५ टक्के मुले आदिवासी होत्या. ९० टक्के शिक्षक हे आदिवासी होते .आमच्या शाळेत आम्हाला कधीच जाती -जमाती वरून संबोधलं जायचं नाही .
        'शिक्षण घेणारी आमच्या घरातली दुसरी पिढी म्हणजे मी .माझे वडील शिकणारे पहिलेच . ते शिकागो विद्यापीठातून पीएचडी करून आले . आदिवासी म्हणून शिकताना काय अडचणी येतात, किती संघर्ष करावा लागतो हे त्यांनी अनुभवलं होतं . माझ्या आईलाही या संघर्षाची जाण होती . मी पाच वर्षांची असताना वडिलांनी मला सांगितलं ,आपण आदिवासी  आहोत म्हणजे आपण कमी आहोत असे इतर समाज ठरवतो, मानतो.  पण आपण कमी नाही .'
         'एक आदिवासी मुलगी म्हणून अभिमान ,आत्मविश्वासाचं बळ माझ्या पायात तेव्हाच निर्माण व्हायला सुरुवात झाली .कमीपणाची जाणीव करून देणारे प्रसंग आयुष्यात आले, तेव्हा मी खचले नाही, ती याच बळाच्या जोरावर!'
       ' मी आठवीत होते. परीक्षेत मला संस्कृत विषयात उत्तम मार्क मिळाले . मी संस्कृतच नाहीतर सर्व विषयात इतरांच्या पुढे होते . पण माझं संस्कृत मध्ये चांगले गुण मिळवणं आमच्या पंडितांना रुचलं नाही . ते मला म्हणाले की, संस्कृत ही आर्यांची भाषा आहे .त्यात तुला चांगले मार्क कसे मिळू शकतात?'
          ' पंडितांच्या या प्रश्नानं मी खरंतर आश्चर्यचकित झाले. पण विचार केला की मी कोणत्या विषयात चांगले गुण मिळवावे हे ठरवणारे हे पंडित कोण? इतर विषयातही मी पुढे आहे तर मग संस्कृत मध्ये पुढे गेलं तर काय होतं? मी नऊ वर्षांची होते तेव्हापासून ठरवलं होतं की ,मी गणितात शिक्षक होणार. कारण आदिवासी समाजात   गणित आणि विज्ञानाची शिक्षक कमी .बिगर आदिवासी शिक्षक आदिवासी मुलांना गणित आणि विज्ञानात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देण्यापेक्षा त्यांचं खच्चीकरण अधिक करतात . हे मी ऐकलं होतं, पाहिलं होतं आणि पुढे जाऊन ते अनुभवलंदेखील.'
     ' मी दहावीची परीक्षा पास झाले. गणितात मला सर्वात जास्त गुण मिळाले होते. पण माझे गणिताचे शिक्षक म्हणाले की ,"तू गणित हा विषय घेऊ नकोस तुला तो पेलवणार नाही .' हे ऐकून माझी तळपायाची आग मस्तकात गेली . मी काय शिकावं कोणता विषय घ्यावा हे ठरवणारे हे कोण ? मी तर गणितच घेणार !मी ठरवलं होतं तेच केलं . '
         ' पुढच्या शिक्षणासाठी आम्ही बंगलोरला गेलो. तिथे गणितात बी .एस्सी, एम. एस्सी .केलं . पुढे एम . फिल .पी एच डी साठी मी दिल्लीच्या जे .एन. यु . विद्यापीठात जाण्याचं ठरवलं पण दुर्देवानं तिथे एम .फिल  , पी . एच . डी . साठी हा विषय नव्हता .तिथे कम्प्युटर सायन्स हा विषय होता .एम.एएस्सी करताना कॉम्प्युटर सायन्सच्या अनेक संकल्पनांशी माझा परिचय झाला होता. गणित हा विषय मला सोडवत नव्हता .पण वडील म्हणाले, "आपल्या समाजात कम्प्युटर सायन्स या विषयाचे शिक्षक फारच कमी आहेत तो हाच विषय घे!" 
           '. मी कम्प्युटर सायन्सला प्रवेश घेतला. पी.एच.डी.ची दोन वर्ष केली आणि भोपाळला असिस्टंट प्रोफेसरसाठी खुल्या गटातून अर्ज केला. नंतर मदुराई येथील कामराज विद्यालयात नोकरी केली आणि मग जे . एन . यु . विद्यापीठात कॉम्प्युटर आणि सिस्टीम सायन्स हा विषय शिकवायला आले   ' 
.        आज झारखंड मधील 'सिधो कान्हो मूर्मू ' या विद्यापीठाची  कुलगुरू म्हणून माझी निवड झाली आहे . माझ्या या निवडीचे  काही अर्थ आहेत . ते मला आवर्जून सांगावेसे वाटतात .एक तर मी आदिवासी, शिकणारी म्हणून दुसऱ्या पिढीतली. पण शिक्षणातली सर्व आव्हानं, स्पर्धा स्वतःच्या बळावर पार करत इतर समाजाच्या बरोबरीने आले. मी तर कोणा पेक्षा वेगळी नाही हे मी यातून सिद्ध केलं. 
या माझ्या निवडीमुळे इतर आदिवासी मुलामुलींना मिळणारी प्रेरणा मला फार महत्त्वाची वाटते.

दुरध्वनीवरून मुलाखत आणि शब्दांकन
_ माधुरी पेठकर
सौजन्य - लोकम*मी कुणी 'वेगळी ' नाही !
✍🏻सोनाझरिया मिंझ

या मुळच्या झारखंडच्या . दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विदयापीठात ' कॉम्प्युटर अॅण्ड सिस्टीम सायन्स ' च्या प्रोफेसर . नुकतीच त्यांची झारखंडमधील ' 'सिधो कान्हो मूर्मू ' या विद्यापीठाच्या कुलगुरु म्हणून निवड झाली आहे . या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्याच महिला आदिवासी आहेत . या सन्माननीय नियुक्ती निमित्तानं त्यांच्या मनोगताचा हा पुर्वार्ध* 

एक आदिवासी महिला ही माझी ओळख आहे आणि अस्मिता, अभिमानही.मी आदिवासी आहे म्हणून इतरांपेक्षा वेगळी, विशेष होते असं मी कधीही मानलं नाही . उलट मी इतर सर्वांसारखीच होते आणि आहे . हे सर्वांना जमत, करता येतं ते मलाही जमायला हवं, हा माझा स्वतःविषयी हट्ट  आहे . हा विश्वास उराशी जपतच मी कुलगुरू या पदापर्यंत पोहोचले आहे .
     रांचीमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालं .ती खास खासगी मिशनरी मुलींची शाळा होती. तिथे ७५ टक्के मुले आदिवासी होत्या. ९० टक्के शिक्षक हे आदिवासी होते .आमच्या शाळेत आम्हाला कधीच जाती -जमाती वरून संबोधलं जायचं नाही .
        'शिक्षण घेणारी आमच्या घरातली दुसरी पिढी म्हणजे मी .माझे वडील शिकणारे पहिलेच . ते शिकागो विद्यापीठातून पीएचडी करून आले . आदिवासी म्हणून शिकताना काय अडचणी येतात, किती संघर्ष करावा लागतो हे त्यांनी अनुभवलं होतं . माझ्या आईलाही या संघर्षाची जाण होती . मी पाच वर्षांची असताना वडिलांनी मला सांगितलं ,आपण आदिवासी  आहोत म्हणजे आपण कमी आहोत असे इतर समाज ठरवतो, मानतो.  पण आपण कमी नाही .'
         'एक आदिवासी मुलगी म्हणून अभिमान ,आत्मविश्वासाचं बळ माझ्या पायात तेव्हाच निर्माण व्हायला सुरुवात झाली .कमीपणाची जाणीव करून देणारे प्रसंग आयुष्यात आले, तेव्हा मी खचले नाही, ती याच बळाच्या जोरावर!'
       ' मी आठवीत होते. परीक्षेत मला संस्कृत विषयात उत्तम मार्क मिळाले . मी संस्कृतच नाहीतर सर्व विषयात इतरांच्या पुढे होते . पण माझं संस्कृत मध्ये चांगले गुण मिळवणं आमच्या पंडितांना रुचलं नाही . ते मला म्हणाले की, संस्कृत ही आर्यांची भाषा आहे .त्यात तुला चांगले मार्क कसे मिळू शकतात?'
          ' पंडितांच्या या प्रश्नानं मी खरंतर आश्चर्यचकित झाले. पण विचार केला की मी कोणत्या विषयात चांगले गुण मिळवावे हे ठरवणारे हे पंडित कोण? इतर विषयातही मी पुढे आहे तर मग संस्कृत मध्ये पुढे गेलं तर काय होतं? मी नऊ वर्षांची होते तेव्हापासून ठरवलं होतं की ,मी गणितात शिक्षक होणार. कारण आदिवासी समाजात   गणित आणि विज्ञानाची शिक्षक कमी .बिगर आदिवासी शिक्षक आदिवासी मुलांना गणित आणि विज्ञानात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देण्यापेक्षा त्यांचं खच्चीकरण अधिक करतात . हे मी ऐकलं होतं, पाहिलं होतं आणि पुढे जाऊन ते अनुभवलंदेखील.'
     ' मी दहावीची परीक्षा पास झाले. गणितात मला सर्वात जास्त गुण मिळाले होते. पण माझे गणिताचे शिक्षक म्हणाले की ,"तू गणित हा विषय घेऊ नकोस तुला तो पेलवणार नाही .' हे ऐकून माझी तळपायाची आग मस्तकात गेली . मी काय शिकावं कोणता विषय घ्यावा हे ठरवणारे हे कोण ? मी तर गणितच घेणार !मी ठरवलं होतं तेच केलं . '
         ' पुढच्या शिक्षणासाठी आम्ही बंगलोरला गेलो. तिथे गणितात बी .एस्सी, एम. एस्सी .केलं . पुढे एम . फिल .पी एच डी साठी मी दिल्लीच्या जे .एन. यु . विद्यापीठात जाण्याचं ठरवलं पण दुर्देवानं तिथे एम .फिल  , पी . एच . डी . साठी हा विषय नव्हता .तिथे कम्प्युटर सायन्स हा विषय होता .एम.एएस्सी करताना कॉम्प्युटर सायन्सच्या अनेक संकल्पनांशी माझा परिचय झाला होता. गणित हा विषय मला सोडवत नव्हता .पण वडील म्हणाले, "आपल्या समाजात कम्प्युटर सायन्स या विषयाचे शिक्षक फारच कमी आहेत तो हाच विषय घे!" 
           '. मी कम्प्युटर सायन्सला प्रवेश घेतला. पी.एच.डी.ची दोन वर्ष केली आणि भोपाळला असिस्टंट प्रोफेसरसाठी खुल्या गटातून अर्ज केला. नंतर मदुराई येथील कामराज विद्यालयात नोकरी केली आणि मग जे . एन . यु . विद्यापीठात कॉम्प्युटर आणि सिस्टीम सायन्स हा विषय शिकवायला आले   ' 
   आज झारखंड मधील 'सिधो कान्हो मूर्मू ' या विद्यापीठाची  कुलगुरू म्हणून माझी निवड झाली आहे . माझ्या या निवडीचे  काही अर्थ आहेत . ते मला आवर्जून सांगावेसे वाटतात .एक तर मी आदिवासी, शिकणारी म्हणून दुसऱ्या पिढीतली. पण शिक्षणातली सर्व आव्हानं, स्पर्धा स्वतःच्या बळावर पार करत इतर समाजाच्या बरोबरीने आले. मी तर कोणा पेक्षा वेगळी नाही हे मी यातून सिद्ध केलं. 
या माझ्या निवडीमुळे इतर आदिवासी मुलामुलींना मिळणारी प्रेरणा मला फार महत्त्वाची वाटते.

दुरध्वनीवरून मुलाखत आणि शब्दांकन
_ माधुरी पेठकर
सौजन्य - लोकमत 
सखी- दि . १६ जून २०२०



शनिवार, 13 जून 2020

लेखन, चिंतन अन् संशोधनाचा झरा...

लेखन, चिंतन अन् संशोधनाचा झरा... 

प्रा. प्रल्हाद जी. लुलेकर



[प्रसिद्ध नाटककार, साहित्यिक दत्ता भगत यांनी आज (१३ जून) वयाच्या पंचाहत्तरीत पदार्पण केले. त्यानिमित्त त्यांच्या वाटचालीबद्दल... ]

भारतीय इहवादी विचार परंपरेचे म्हणजे बुद्ध-फुले-आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या तत्त्वज्ञानातून महाराष्ट्रात परिवर्तनवादी विचारधारा प्रवाहित झाली. याच विचारांतून सत्यशोधकी, ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्रीवादी साहित्य चळवळी, प्रवाह निर्माण झाले. स्वातंत्र्यानंतर समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य या मूल्यांचा आग्रह दलित साहित्याने आपल्या भूमिकेसह आविष्कृत केला. या प्रवाहातील महत्त्वाचे नाटककार म्हणून प्रा. दत्ता भगत यांनी आपले लेखन मराठी साहित्याला दिले. महाराष्ट्र, महाराष्ट्राबाहेर त्यांनी नाटककार, समीक्षक, ललित लेखक, विचारवंत, वक्ता म्हणून नावलौकिक मिळविला. 

परिवर्तनवादी चळवळीचे ऐतिहासिक संदर्भ विचारात घेऊन वर्तमान प्रश्‍न गांभीर्याने मराठी नाटक, रंगभूमीवर उपस्थित करणारी नाटके त्यांनी मराठी नाट्यसृष्टीला दिली. बुद्ध-फुले-आंबेडकर विचारांनी विषम व्यवस्थेच्या समाप्तीसाठी विचार आणि कार्य केले. त्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध समतावादी विचारांनी संघर्ष केला. हे सारे संघर्ष मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी आहेत, ही जाणीव साहित्यातून आग्रही भूमिकेसह साकार केली. जात, वर्ण, लिंग, धर्म यातून आलेल्या साऱ्या भेदभावना नाकारून त्याविरुद्ध विद्रोह केला. मानवी अप्रतिष्ठा करणाऱ्या विसंगत, विसंवादी, अंतर्विरोधी वर्तनावर भाष्य करीत प्रहार केला. प्रा. दत्ता भगत यांच्या ‘अश्‍मक’, ‘खेळिया’, ‘वाटा-पळवाटा’, ‘पुस्तकी वांझ चर्चा’ या नाटकांनी आणि ‘आवर्त’, ‘चक्रव्यूह’, ‘जहाज फुटलं आहे’, ‘आम्ही सगळे’ या एकांकिका संग्रहातील एकांकिकांनी अनेकविध पातळीवरील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय संघर्ष समाजासमोर प्रखर जाणिवेने आविष्कृत केले. वर्णव्यवस्थात्मक सामाजिक संरचनेला आव्हान देणाऱ्या चळवळीची विचारसूत्रे त्यांच्या नाटकाने विलक्षण सामर्थ्याने साकार केली. त्यामुळेच त्यांची ‘वाटा-पळवाटा’, ‘अश्‍मक’, ‘आवर्त’, ‘चक्रव्यूह’, ‘जहाज फुटलं आहे’ या नाट्यकृतींचे इंग्रजी, हिंदी, तेलुगू, कन्नड भाषांत अनुवाद झाला. त्यांच्या विशेष गाजलेल्या ‘वाटा-पळवाटा’ या नाटकावर विजय तेंडुलकर, गो. पु. देशपांडे, अमोल पालेकर, सतीश आळेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी गौरव केला. त्यांच्या नाटक आणि रंगभूमीवरील योगदानामुळे ८६व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होण्याचा सन्मान त्यांना मिळाला. 

त्यांनी केलेले समीक्षा लेखन नवी मांडणी करणारे आहे. ‘निळी वाटचाल’, ‘दलित साहित्य ः दिशा आणि दिशांतरे’, ‘विजय तेंडुलकर ः व्यक्ती आणि वाङ्‍मय’, ‘साहित्य समजून घेताना’, ‘समकालीन साहित्य आणि साहित्यिक’, ‘आधुनिक मराठी साहित्याची सांस्कृतिक पार्श्‍वभूमी’ या ग्रंथांतून त्यांची मौलिक समीक्षा आली आहे. ‘बिसापच्या गोष्टी’ हे त्याच्या कल्पक प्रतिभासंपन्नतेची उत्तम निर्मिती आहे. त्यांचे पिंपळपानांची सळसळ आणि पाऊलवाटा हे ललित लेखन वेगळ्या अनुभूतीची साक्ष देतात. या सर्व लेखनांसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. नागपूरच्या मारवाडी फाउंडेशनचा पाच लाखांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचे साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार यासह अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे. 

अलीकडे त्यांनी दोन महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. ‘मराठी नाटक आणि रंगभूमीचा इतिहास’ हा संशोधन ग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केला आहे. नाट्यवाङ्‍मयाची निराळी मांडणी या साडेसहाशे पानांच्या ग्रंथातून आली आहे. मराठी रंगभूमीचा शोध, कालखंडाच्या नावासह नव्या कालखंडाची पुनर्मांडणी, नाटककार जोतिराव फुले आणि दलित रंगभूमीच्या निराळ्या भूमिकेसह वेगळा विचार या ग्रंथाने दिला आहे. नाट्यवाङ्‍मयाच्या इतिहासाच्या लेखनाचे हे कार्य अभ्यासक-संशोधकांना मार्गदर्शक ठरणारे आहे. 

वयाची ७५ वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रा. दत्ता भगत यांनी गेल्या सात-आठ वर्षांपासून स्वतःला वेगळ्या संशोधनकार्यात गुंतवून घेतले. आता हे काम पूर्ण झाले आहे. त्यांचे हे साडेसातशे पानांचे लेखन राज्यासाठी आणि देशासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राजकीय दैनंदिनी त्यांनी ससंदर्भ सिद्ध केली. हे प्रकाशनासाठी सिद्ध होतानाच त्याचा हिंदी अनुवाद डॉ. सूर्यनारायण रणसुभे करीत आहेत. या नव्या लेखनाचे शीर्षक ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय कार्य’ (‘कालिक सूची'च्या संदर्भात राजकीय कार्य) असे आहे. हे लेखनकार्य ऐतिहासिक ठरणार आहे. 

आयुष्यभर प्रा. दत्ता भगत यांनी विवेकनिष्ठेने मूल्यसंघर्ष आपल्या लेखनातून साकारला. शिक्षक-प्राध्यापक म्हणूनही निष्ठेने काम केले. अलक्षितांच्या अस्तित्वासाठी आपले लेखन, माणसाच्या प्रतिष्ठेसाठी लेखन, लेखनातून नवे सामाजिक भान देत प्रा. दत्ता भगत लिहीत राहिले. भविष्यात हीच लेखनसमृद्धी मराठी साहित्याला संपन्न करेल. त्यांच्यातील संवेदनशील लेखक, मानवतेसाठी अस्वस्थ असणारा निखळ माणूस मी पंचेचाळीस वर्षांपासून अनुभवला आहे. हा अनुभव आनंददायी आहे.
-डॉ. प्रल्हाद लुलेकर

शनिवार, 6 जून 2020

रात्र, दुःख आणि कविता : प्रा.मीनल येवले



पोळत्या जीवनानुभवांची अनुभूती-- वणवा

          पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वार्षिक साहित्य संमेलनात सहभागी कवींना पुष्पगुच्छासह एकेक पुस्तक देण्यात आले. कार्यक्रम संपल्यानंतरच्या भेटीगाठीत एका मैत्रिणीच्या हाती “ रात्र, दुःख आणि कविता ” हा संग्रह दिसला. कवयित्रीचं नाव वाचून अस्वस्थ झाले कारण तो मला हवा होता ना ! मी तशी मैत्रिणीकडे इच्छा व्यक्त केली नि माझे काव्यवेड ठाऊक असल्याने की काय, तिने तो सहज मला दिला. कविता वाचून त्यांच्या प्रेमातच पडले सोबत कवयित्रीच्याही !
            अंजली कुलकर्णी या पुण्यातील सुप्रसिद्ध, जेष्ठ कवयित्रीचा संपूर्ण महाराष्ट्राला परिचय आहे. आपल्या आगळ्या-वेगळ्या काव्यशैलीने, समृद्ध अनुभवविश्वातून संपन्न झालेल्या काव्यकृतीमुळे त्यांच्या कविता रसिक प्रिय असून या कवितांचा लौकिक सर्वदूर पसरलेला आहे. आजवर त्यांच्या कविता विविध अनियतकालिकातून, दिवाळी अंकातून वाचून होते. लॉकडाऊनच्या काळात अंजलीताई ऑन लाईन कविसंमेलनातून, कधी संवादातून भेटू लागल्या. या निगर्वी, सुस्वभावी व्यक्तिमत्त्वाशी आता तर छान स्नेहबंध जुळून आले.
               त्यांच्या “ रात्र, दुःख आणि कविता ” या संग्रहात “रात्र” या विषयावरील 32 , “दुःख ” विषयाला धरून 33 तर “कविता” विषय घेऊन 18 कविता आहेत. या सर्व कविता एकत्र वाचताना रसिक काव्यानंदाच्या झुल्यावर झुलत राहतो. मीही तो अनुभव घेतला. या कवितेतून भेटणारी जादूगरीन, बहुरागिनी, बहुरूपिणी, कधी मादक, कधी भयभीत करणारी, कधी ध्यानस्थ बसवणारी अशी रात्रीची विविध रूपं आपल्याही मनात कुतूहल निर्माण करतात. या कवितांमधून रात्रीच्या अंधारात स्वतःच्या आतला उजेड शोधणाऱ्या सृजनशील काव्यमनासारखाच उघड्या, मोकळ्या, निखळ, माणसांविरहितच्या निसर्गाशी रसिकांनाही संवाद साधता येतो. या कविता वाचताना मलाही निसर्गाचा एक अंश झाल्याची प्रचिती अनुभवता आली.
             संग्रहातील कविता रात्र, दुःख या संदर्भाभोवती फिरत असताना दुःखाचे आणि रात्रीचे अनेक कंगोरे कवितेतून उलगडत जातात. बऱ्याचशा कवितांमधून हृदयाच्या अंतर्हृदयाशी साचलेलं दुःख पृष्ठावर येतं, बऱ्याच कवितांमधून उसवलेल्या काळजाच्या व्यथा रसिकांनाही उसवून काढतात. सर्व पुढ्यात असून कसलं हे अपुरेपण ? कसली ही अतृप्ती ? ज्ञाताच्या पल्याडची... अज्ञाताच्या शोधाची तर ही धडपड नाही ना ! कदाचित त्यासाठीचंच हे खदखदणं असावं. अनेक कवितांमधून प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे ते उजागर होताना दिसते.
            रात्र म्हणजे इतरांच्या दृष्टीने संपणं, आनंदाचा- आशेचा- कृतिशीलतेचा शेवट क्वचित मृत्यूही ! पण कवयित्रीला रात्र या साऱ्यांची सुरुवात वाटते. ती संजीवक पेय वाटते.
     थकून झोपून जाते रात्र चंद्राच्या ढोलीत
      हर एक नशा लाट बनून ओसरते
      काळ वाहत राहतो वाऱ्याबरोबर चेहऱ्या शिवाय
       हर एक फूल गंधाळल्याविना कोमेजते...
             “ हिवाळ्यातल्या चंद्ररात्री ” कवितेत हिवाळ्यातल्या चंद्ररात्रीचं संयमी, सृजनक्षम मनाने अनुभवलेलं, टिपलेलं एक क्षणचित्र आहे. ते सुखदुःखाच्या कल्लोळासह, भवतालच्या निसर्ग घटकांसह, कवयित्रीच्या भावभावनांच्या आंदोलनासह साकारलं गेलंय. प्रतिभकल्पनेच्या कुंचल्यातून साकारलेलं ते चित्र मग फक्तच हिवाळ्यातल्या चंद्ररात्रीचं राहत नाही तर त्या चांदणरात्रीच्या शांत, एकांत प्रहरात कवयित्रीच्या वाहत्या इच्छांचे, स्वप्नांचे तलम पापुद्रेही उलगडू लागतात, जे काळानं ओरबाडून घेतले आहेत.ऐन बहरत्या वळणावरची आपल्या कैफात जगण्याची नशा वाहत्या काळासह ओसरत गेली. आणि मग कवयित्रीच्या इच्छा-अपेक्षांचं फूल गंधाळल्याविनाच कोमेजून गेलं.
             या कवितांमधून रात्र वेगवेगळ्या रूपात येते. सकाळच्या उन्हात कोवळेपणानं हसणारी शहाणीसुरती झाडं रात्री अचानक वेडी बनतात, असा अनुभव कवयित्रीला येतो नि मग प्रश्न पडतो-   
         काय होत असतं रात्री 
         दोन वाजताच्या अवकाशात 
          जे भयही घालतं
           अन् खेचूनही नेतं घरापाठीमागच्या वावरात ?
          तर “ गुंफन ” कवितेतील रात्र तिच्या आत उलगडत जाणारी.
           तुकड्या-तुकड्यातून अंधारगुहेत
            झिरपत नेणारी.....
    निजलेल्या बाळाने निर्व्याजपणे अंथरूणावर लोळत राहावे तशी एका रात्रीतून दुसऱ्या रात्रीत कवितेतील ती घरंगळत राहते रात्रभर.
           रात्रीच्या विभ्रमावर दुःखाची झिलई चढलेली आहे. शिशिररात्र तर आपल्या काळ्या आवरणाखाली अवघा भवतालच गुरफटून घेते.
          एका एका पानाचे तर्पण करत
          साऱ्याच इच्छा वासनांना
           तिलांजली देत....
           जगण्याचे सारे हिरवे कोवळे क्षण
           निबर होऊन कोळपून चाललेले....
         रात्रीच्या काळोखातच जगण्याची उर्मी, बळ, उद्याची आशा लपलेली आहे हेही ही कविता मान्य करते आणि मग कवयित्रीला काळोखाच्या मद्याचं व्यसनच जडतं. अंजली कुलकर्णीच्या कविता वाचून खात्री पटते की, कविता अबोध मनाचे नैसर्गिक अविष्कार मनाच्या पृष्ठभागावर आणते आणि मनाच्या पातळीवरील सृजनोत्सवातून कविता जन्म घेते.
          कवितासंग्रहातील सर्व कविता सुरुवातीला अधाशासारख्या वाचून झाल्या पण अशाने ही कविता कळणारी नाहीच. मग एकेकीला हळुवारपणे आस्वादण्यासाठी संग्रह हाती घेतला. नकळत संग्रहातील कवितांमधून “ वणवा ” नावाच्या कवितेपाशी येऊन थांबले. सद्यस्थितीत भयाच्या काळ्या वणव्यानं, कोरोना नावाच्या विषाणूनं आपलं जगणंच होरपळून निघत आहे. आपल्या मनातले सगळे ऋतूच करपून गेले.
     “ चहूकडून सुसाटल्यात ज्वाळा, भडकलंय रान” याप्रमाणे चिंतीत भविष्य अनेक प्रश्न घेऊन आपल्या पुढ्यात उभं आहे. कदाचित सद्यस्थितीतल्या या भयग्रस्त वर्तमानाचे प्रतिबिंब या कवितेत माझ्या मनाने शोधले असावे. मात्र संग्रहात एकाहून एक सरस कविता असतानाही मन इथेच येऊन थबकले.
        रात्रीचं अरण्य, काळा धूर, भडकलेलं रान, घुसमटणारा श्वास, मुका वणवा, गळणारे डोळे अशा अनेक शब्दप्रतिमांमधून पेटलेल्या ह्या वणव्याची धग माझ्याही मनापर्यंत येऊन पोहोचली नि मला व्यक्त होण्यास भाग पाडले. काळोख्या रात्री अरण्याला चहूबाजूंनी घेरल्यावर झाडं, पानं, लता, वेली होरपळून निघतील, जीवाला आच पोहोचू लागल्यावर प्राणी जीवाच्या आकांतानं सैरावैरा धावू लागतील या लाक्षणिक अर्थाच्या पल्याड ही कविता आपल्याला अंतर्मनाला लागलेल्या न दिसू शकणाऱ्या वणव्यापाशी घेऊन जाते.
         किती किती स्वप्न रंगवतं मन शांत, स्वस्थ जगण्याची, आपल्या अवकाशात मुक्तपणे उंच उंच उडण्याची ! फुलण्यासाठी, बहरण्यासाठी, दरवळण्यासाठी किती धडपड चाललेली असते आयुष्याची ! सारे ऋतू पणाला लावतो आपण आनंद आणि सुखाच्या प्राप्तीसाठी पण नियती नावाची गुढ शक्ती काय काय लीळा करेल आपल्या जगण्यासोबत सांगता येत नाही. सारे फासेच उलटे पडावेत आजवर टाकलेले... काहीच घडू नये मनासारखं... अशावेळी संवेदनशील मनाची किती तगमग होत असेल ? प्रतिभकल्पनेला पोळणाऱ्या धगीतूनच “ वणवा ” साकारली गेली असावी कदाचित. ऐन उमेदीचे दिवस या धगीत पोळून निघालेले. न्यूनतेच्या दुःख ज्वाळात धगधगत राहिल्या इच्छा-आकांक्षा. बदलवता आले नाहीत दिवस, थोपवता आला नाही नकोनकोसा असह्य वर्तमान की शांतवता आलं नाही अंगावर चालून आलेल्या पोळत्या ज्वाळांना.
         चहूबाजूंनी घेरलंय काळ्या वनव्यानं
          रात्रीच्या अरण्याला
          होरपळून गेलीयेत झाडं पानं लता वेली
           होरपळून निघालेत हरणं ससे गवे हत्ती
      कवितेची सुरुवातच अशी जीव पोळून काढणारी आहे. वरवर सुखी दिसणारं आयुष्य तर आलेलं वाट्याला पण कशी ही घुसमट ? स्वस्थपणे जगताही येत नाही की, दुःख मोकळही करता येत नाही.
       काळ्या आगीनं होतोय सर्वांगाचा दाह
        काळ्या धुरानं घूसमटतोय श्वासांचा मार्ग
     दोनच ओळींचा हा पुढला बंध. आयुष्याकडून केलेल्या अपेक्षा अपूर्णच राहिल्या. जगणं पोळून काढणाऱ्या घटीतांच्या काळ्या धुरानं श्वास घुसमटतोय. “ आपुले मरण पाहिले म्या डोळा ” संत तुकारामाच्या अभंगाप्रमाणे आतल्या आत चाललेला हा इच्छा- भावनांचा- अपेक्षांचा मरण सोहळा स्वतःचा स्वतःच अनुभवायचा. सांगणार तरी कुणाला ?
          चहूकडून सुसाटल्यात ज्वाळा
          भडकलंय रान
           हे पेटतंय तडतड गवत
           ठिणग्यांतून बेभान
     मुक्तछंदातील ही अल्पाक्षरी रचना. अल्प शब्दातून मोठा आशय पेलत शेवटाकडे सरकत जाते हळुहळू. आता तर अवघं रानच भडकलंय. तडतड करत पेटलेल्या गवतातून बेभानपणे ठिणग्या उडायला लागल्या आहेत. आता विझण्याची शक्यता नाहीच.
        कवयित्रीला निर्मितीच्या वेणा इतक्या अनिवार झालेल्या की, कवितेशी संग केल्याशिवाय स्वस्थता नाहीच. आतले सारे कल्लोळ तिच्या पायाशी वाहिल्या शिवाय शांती नाहीच लाभायची. हा दुःखाचा, कुढण्याचा, जळण्याचा आगळा-वेगळा खेळ समजून घेते फक्त कविता. ती जळत्या क्षणांनाही कवेत घेते. अंतरंगात पेटलेल्या वणव्यालाही निवविण्याचं सामर्थ्य असतं फक्त कवितेत.
           साऱ्या आयुष्याचंच अरण्य झालेलं, इच्छांनाच वणवा लागलेला, मुक्यानं अश्रू गाळता गाळता आयुष्याची कितीतरी पाने उलटून गेली. कायम एक सल सोबत घेऊन जगतांनाची ठस ठस शेवटच्या कडव्यात येते.
        रात्रभर धुमसत राहिल अरण्य
         मुक्या वणव्यानं
         रात्रभर शिंपत राहिल रान
          गळणाऱ्या डोळ्यातनं...
      मनाविरुद्धच्या घटनांनी होरपळून निघालेल्या जगण्यातील दाहकता, तीव्र अनुभवांची टोकं “ वणवा ” या प्रतिमेतून आलेली आहेत. हा वणवा रात्रीच्याच अरण्याला का लागलेला आहे ? मनोगतातून कवयित्रीने या रात्रीच्या अंधाराची, धगधगण्याची ससंदर्भ स्पष्टीकरणे दिलेली आहेत. “ दिवसभर स्वतःशी सोडून इतर सर्वांशी जोडून घ्यावं लागतं, तेव्हा मनाला ही मोकळीक नसते. रात्र तशी मोकळीक देते, अवकाश प्राप्त करून देते म्हणून रात्र तशी जवळची वाटते. तिच्याजवळ सगळ्या गोष्टी मोकळ्या करता येतात. आशा-निराशेचे प्रहर, सुखदुःखाचा झमेला, अनुभव, घटना, प्रसंगातून निर्माण झालेली सहकंपनं, विचार, भावना, संवेदना- रात्र सारंच आपल्या कवेत घेते आणि कवितेच्या ओळींतून सारं ओघळू देते.”
              रात्रभर शिंपत राहिल रान
               गळणाऱ्या डोळ्यांतनं...
       या ओळींमधून ते प्रभावीपणे सूचित होते. रात्र म्हणजे भयान भेसूराची भयभीती, रात्र म्हणजे गुढरम्यता, आकर्षकता तसेच रात्र म्हणजे एकट्यानं स्वतःमध्ये शिरण्याची वेळ. दुथडी भरून वाहणाऱ्या मनाची ही रिकामी वेळ. ती व्यावहारीक जगाचा सांधा निखळून एका आदिम निसर्ग भावनांशी मनाला घसट करू देते. कवयित्रीने “ एकाएकी ” नावाच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे -
               अंधाराचेच डोळे घेऊन मी
               अंधारातच झिरपत राहिले,
                झिरपत राहिले....
         कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी मनोगतात म्हटल्याप्रमाणे “रात्र आई झाली आणि तिनं स्वतःचीच छोटी रूपं असावीत अशा कविता जन्माला घातल्या. म्हणजे जननीही तीच आणि अपत्यही तीच... कवितेच्या एका अपरिहार्य काळ्या गर्तेत स्वतःला झोकून दिलं अन् चक्क असीम आनंदाचा समुद्र उचंबळून आला ” असा या कविता निर्मितीमागील अनुभव अचाट, अलौकिक, जीव उसवून काढणारा तितकाच मखमलीही आहे.
          निसर्ग, समाज आणि संवेदनशील मन या तीन पातळ्यांवरून एकसंघपणे जगत असताना अनुभूतीचे जे तरंग, लहरी, घाव, जखमा, जे चरे, ओरखाडे कवयित्रीच्या मनावर उमटले त्यांना शब्द मिळाल्याने हे तरंग, लहरी, घाव, जखमा, चरे, ओरखाडे या कवितेतून सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी झाले आहेत.
              *****************
कवितासंग्रह - “ रात्र,दुःख आणि कविता ”
अंजली कुलकर्णी , पुणे.
प्रकाशन  - पद्मगंधा प्रकाशन , पुणे.

प्रा. मीनल येवले 
42 , विज्ञान नगर,मानेवाडा,नागपूर-34
मो. नं. 7774003877