शुक्रवार, 27 नवंबर 2020

महात्मा फुले -स्त्री दृष्टीकोण : रचना

             महात्मा फुले -स्त्री दृष्टीकोण : रचना 





शतकानुशतकापासून परंपरागत जीवनपद्धती जगत आलेल्या समाजाला, अनिष्ट प्रथा अंगवळणी  पडलेल्या मानवाला, स्त्रीदास्य, ज्ञान ,सामाजिक विषमतेच्या भोवऱ्यात अस्तित्व हरवून बसलेल्या मानवी समाजाला बुद्धिप्रामाण्यवाद धर्माची समाजशास्त्रीय विश्लेषण आणि व्यवहारी दृष्टिकोण यांचा तत्वप्रणालीच्या आधारे नवसंजीवनी देऊन समाज-परिवर्तनाची कृतिशील पाळेमुळे रोवणारे महामानव म्हणून महात्मा फुले  यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल विसाव्या शतकातील तळागळातील समाजाचे उद्गगाते ,स्त्रीशिक्षणाचा जनक महात्मा फुले होय.

       उतरंडीच्या स्वरूपात अस्तित्वात असलेली अनेक जाती धर्माची समाजरचना ,संस्कृती, रूढी परंपरेच्या नावाखाली मिळवल्या जाणाऱ्या अनेक अनिष्ट प्रथांची , मिथकांची,धर्माची चिकित्सा करून ,मानव्याच्या आड  येणारी धर्मांधता ,सनातनी संस्कृतीची चौकट कालबाह्य ठरवत ,समतावादी मानवतावादी समाजरचना अस्तित्वात आणू पाहणारे महात्मा फुले हे द्रष्टे  युगपुरुषच  म्हणावे लागतील. समाज, देश आणि राष्ट्रांना आज सुद्धा तंतोतंत लागू पडेल असे विवेचन महात्मा फुले   राष्ट्राच्या बाबतीत करतात . बऱ्याच ठिकाणी म . फुले म्हणतात , " जाती जातीत व धर्माधर्मात निबध्द झालेल्या समाजाची गाठोडी म्हणजे राष्ट्र नव्हे . " ( १ .म. फुले समग्र वाङमय _ प्र . आ .१९९६  प्रस्तावना .पान क्र .१६ )तर धर्माच्या बाबतीत ते म्हणतात ." धर्मातधर्मात जे जे सांगितले आहे ते सत्य होय ही एक अंधश्रद्धा होय आहे आणि ती नाहीशी झाली पाहिजे तर जगातील सर्व धर्म हे गैरसमजावर व अंधश्रद्धेवर आधारलेले आहेत यापुढे माणसाने गेले पाहिजे आणि कोणत्याही प्रादेशिक समाज हा विश्व समाजाचा घटक म्हणून राहिला पाहिजे" ( २ .प्रस्तावना,म . फुले समग्र वाङमय प्र . आ . १९९६, पान क्र .१७ )अशी स्पष्ट  विचारसरणी असणाऱ्या महात्मा फुलेंनी ईश्वराला निर्मिक असे म्हटले आहे  मानवाची सेवा किंवा मानवी समतेचे व स्वातंत्र्याचे रक्षण ही खरी ईश्वर पूजा होय आणि सत्य हाच एक केवळ खरा धर्म आहे त्याआधारेच समाजरचना अस्तित्वात आली पाहिजे असे मत फक्त मत मांडले नाही तर सार्वजनिक सत्यधर्माचे रूपाने त्याची बीजे ही रोवली .

       महात्मा फुलेंना मानवीय समतावादी राष्ट्रवाद गुणधर्म संकटातून मुक्त करून माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी अब्राम्हणी  समाजरचना अपेक्षित होती . धर्माने जातीभेद ,स्त्रीदास्य आणि सामाजिक विषमता पेरली होती. धर्माने शिक्षणाचा अधिकार फक्त ब्राह्मणांना  होता इतर जातींना आणि संपूर्ण स्त्री जातीला असणारी शिक्षण बंदी ,त्यामुळे रुजलेले अज्ञानच सर्व सामाजिक समस्यांचे मूळ आहे, हे महात्मा फुलेंनी जाणले . कालौघानुसार धर्म आणि धर्मग्रंथांमध्ये परिवर्तन झाले पाहिजे .  हा आग्रह त्यांनी सत्य धर्माच्या आधारे मांडला आहे .

    परंपरेने चालत आलेल्या धर्मग्रंथाने स्त्री आणि शुद्रातिशुद्रांची मने  अंकित करून त्यावर विषमतेचे तत्वज्ञान थोपले आहे . ही मने दुष्ट प्रवाहातून मुक्त केल्याशिवाय कोणत्याही वाटा त्यांच्यासाठी खुले होण्याची शक्यता आहे असे जोतीरावांचे मत होते . याचा अर्थ जोतीरावांना अपेक्षितही अशी समाजरचना समता, न्याय ,बंधुता यावर आधारित समाजरचना निर्माणासाठी स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांची की मानसिक पुर्नरचना आवश्यक होती . स्त्रिया आणि शुदातिशुद्रांचे मानसिक पुर्नरचना  झाल्यास समाजपरिवर्तन निश्चीत घडून येईल आणि हे कार्य फक्त शिक्षणानेच  होऊ शकते यावर महात्मा फुले यांचा विश्वास होता .

         स्त्री आणि पुरुष वास्तव्य करून असणारी कुटुंब व्यवस्था आणि समाजव्यवस्था दोन्ही विषमतेने ग्रासलेल्या होत्या . स्त्रीला समाजात तर नाहीच पण कुटुंबातही निम्न दर्जाची स्थान होते . हे भयानक वास्तव जोतीरावांना अस्वस्थ करून गेले . महात्मा फुले यांच्या विचारसरणीचे तत्वे हे  शाश्वत नैतीक सत्त्यावर आधारित आणि मानवी गरजांना अनुसरून निर्माण झालेली होती .शूद्रातिशूद्रांना जातपातीची उतरंड नष्ट करून, न्यायाने समतेने जगता यायला हवे . स्त्रियांना समाजात पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळाले पाहिजे ही त्यांची तळमळ होती .त्यामुळे स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांना शिक्षण देऊन त्यांच्या जीवनाचा विकास करणे हे  म . फुले यांचे ध्येय होते . धर्म ,जात आणि परंपरागत रुढींनी अस्तित्वात असलेल्या अनिष्ट प्रथा नष्ट करणे स्त्रियांची गुलामगिरीतून सुटका करणे, अशा क्रांतिकारी कार्याची बीजे त्यांच्या विचारसरणीत होती .

तत्कालीन  समाजात धर्मग्रंथांनी स्त्रियांवर अनेक बंधने लादली होती . त्या काळात   स्त्रियांनी शिक्षण घेणे हा अधर्मच होता . स्त्रियांना पायात चपला घालायला आणि छत्री वापरायला बंदी होती .स्त्रियांचे चूल आणि मूल एवढेच  जीवन कार्य होते . स्त्रियांना घराबाहेर पडण्याची बंदी होती .बालिकांचे सर्रास  बालविवाह ,जरठ-कुमारी विवाह होत . I स्त्रियांच्या मासीक धर्माचे .निमित्त करून स्त्रिय यांना अपवित्र ठरवले गेले होते .स्त्रियांकडून घडणार्‍या छोट्या-छोट्या चुकांना कठोर शिक्षा असत . विधवांना जगणे   नाकारलेले  होते . एकतर सती जावे लागे किंवा केशवपन करून अनेक बंधने लादून घेऊन जगावे लागे . विधवांचे जीवन कुंचबणा ., मानहाणी, मरणयातनांनी भरलेले होते . राजा राम मोहन रॉय यांच्या अथक परिश्रमाने कायद्याने सतीची चाल बंद केली होती परंतु विधवांचे हाल संपले नव्हते .

       महात्मा ज्योतिबा फुले हे खऱ्या अर्थाने सुरक्षित होते .ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानाचे उपयोजन त्यांना योग्य तऱ्हेने कसे करावे हे माहिती होते . तत्वज्ञान माहिती असणारे, ज्ञान पांडित्य वाणीने समाजावर अधिराज्य गाजवणारे, त्याकाळी बोलके सुधारक खूप  होते परंतु मानवी जीवनातील अवास्तव धर्माचे  वास्तव असे होते की धर्माची  चिकित्सा करण्याचे धाडस खूप कमी जणांनी  केले आहे . धर्मातील नको त्या गोष्टी काढून टाकून त्या ठिकाणी योग्य त्या बाबींचे नियोजन करणे भल्याभल्यांना जमलेले नाही . सॉक्रेटिसने म्हटले आहे, ' धर्म ही अफूची गोळी आहे ' या वाक्यावरूनच  धर्माचा मानवी मनावर किती अंमल आहे , हे दिसून येते . परंतु महात्मा फुले यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या पावलावर पाऊल टाकत धर्माची चिकित्सा केली . मानवाला माणूस म्हणून स्थान देणारा  धर्म त्यांना अपेक्षित होता . माणूस म्हणून समाजात समान व न्याय्य वागणूक मिळाली पाहिजे हा त्यांचा आग्रह ,अट्टाहास आणि ध्येय  होते .

      'सार्वजनिक सत्यधर्म ' या पुस्तकामध्ये म . फुलेंचा स्त्रीविषयक दृष्टीकोण , परिस्थिती आणि समाजातील  स्थिती फुलेंनी किती अचूक ओळखली होती हे लक्षात येते .

१ . स्त्रियांचा गौरव- म . महात्मा फुले यांच्या विचारसरणीवर बुद्ध, कबीर संत तुकाराम , म .बसवेश्वर देशी विचारवंताचा तसेच थॉमस पेन, मार्टीन ल्युथर , स्टिव्हनसन,डॉ. विल्यम इत्यादी पाश्चात्त्य विचारवंताचा विचारकार्याचा महात्मा फुलें वर प्रभाव दिसून येतो . 'राइट्स ऑफ द मेन ' या ग्रंथाचा खूप मोठा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वावर  दिसून येतो .पेनच्या धर्मचिंतनाच्या प्रभावाने आणि म .फुलेच्या चिकित्सक वृत्तीने  तत्कालीन समाजातील शूद्रातिशूद्र आणि स्त्रियांना माणूस पणाने जगण्याचे बळ देण्याचे भान महात्मा फुले यांना आले . साहजिकच महात्मा फुले हे  स्त्रिया व शूद्रातिशूद्राची स्थिती अस्वस्थ झाले . स्त्रिया व शुद्रातिशुद्रांना आणि एकूणच सर्व मानवांना समानतेचे , बंधुतेचे स्थान असावे . स्त्रियांविषयी समानतेची आणि न्याय्य दर्जा देण्याची आकांक्षा असऱ्यावरूच

महात्मा फुले यांच्या विचारांतील स्त्री विषयक  गौरव स्पष्ट होतो . 'सर्व प्राणिमात्र स्त्री श्रेष्ठ आहे 'असे त्यांचे मत होते .  महात्मा फुले आपल्या सार्वजनिक सत्यधर्म ( ३ . सार्वजनिक सत्य धर्म पृ . क्र .९ ते .१३ )या पुस्तकातील संवादावरून म . फुलेचा स्त्रीविषयक दृष्टीकोण स्पष्ट होतो .म फुलेंच्या मते, ' स्थलचर, जलचर खेचर या सृष्टीतील प्राणीहे तीन प्रकार आहेत तीनही प्रकारच्या प्राण्यांमध्ये माणूस श्रेष्ठ आहे आणि मानवत मध्ये स्त्री-पुरुष या दोन ते दहा पैकी स्त्री ही सर्वात श्रेष्ठ आहे कारण स्त्री ही भिडस्त स्वभावाचे आहे स्त्रिया पुरुष कसाही असला तरी उदाहरणार्थ म्हणून मी दृष्ट दृष्ट लबाड सज्जन दुर्जन शांत कसाही असो पुरुषाला नवरा म्हणून आयुष्यात चांगले त्याचे मूळ स्वतःच्या पोटात वाढवून जन्म देते सर्वांचा सांभाळ करते सर्वांची काळजी घेते कोणीपण अपंगाला चार असला तरी त्याला टाकून न देता मोठ्या धैर्याने प्रेमभावनेने त्याचे सगळे करत राहते सर्वांचे उपकार फिटणार फिटणार नाहीत यापेक्षा स्त्री ही जास्त श्रेष्ठ आहे



    पत्नी आणि मातेच्या बँकेतच नाही तर ती मनुष्यमात्राच्या जगण्यातील प्रत्येक नात्यामध्ये असणारी स्त्री ही आपल्या आपलं जगणं समृद्ध करत राहते बहीण मग ती लहान असो किंवा मोठी आपल्या म्हणून त्याची काळजी घेत राहते निरपेक्ष पाठराखण करत राहते श्री घरात असल्याशिवाय घर शोभत नाही स्त्री पुरुषांच्या, कुटूंबियांच्या एकूण सुख दुःखात भागीदार होते. त्यामुळे स्त्री ही निःसंशय श्रेष्ठ आहे .'

 २ . स्त्रियांचा स्वभाव- सार्वजनिक सत्य धर्ममध्ये ( ४ . पान क्र . १० व ११ )म . फुले म्हणतात . , ' स्त्रिया पुरुषांवर जास्त प्रीती करतात ' या बाबीचे प्रमाण देताना महात्मा फुले तत्कालीन समाजातील परिस्थिती विशद करतात ते म्हणतात, "एखाद्या स्त्रीचा नवरा ज्यावेळेस मत होतो त्यावेळेस ती फार दुःख सागरात बुडून तिला फार संकटे सोसावी  लागतात .. मरेतोपर्यंत सारा काळ वैधव्यात काढावा लागतो इतकेच नव्हे तर पूर्वी कित्येक सतीदेखील जात . परंतु पुरुषाला तिच्याविषयी दुःख होऊन तो कधी 'सता ' गेलेला ऐकिला आहे काय ? तो लागेल तितकी लग्ने  करू शकतो . तसेच घरांमध्ये महापतिव्रता स्त्री असता अत्यंत लोभी पुरुष  तिच्या उरावर दोन -तीन  बायका करतात .त्याचप्रमाणे एकंदर सर्व स्त्रिया एका पुरुषाबरोबर लग्न लागल्यानंतर त्याच्या घरी नांदत असता दुसऱ्या एखादया गृहस्था बरोबर लग्न लावून  त्यास आपल्या पतीचा 'सवता 'करून नांदत नाहीत

३ . स्त्रियांवरील अन्यायाचे मूळ अज्ञान- निसर्ग निर्मीत मानव प्राण्यांतील स्त्री पुरुष या दोन जाती समान असल्या तरी | I स्त्रियांना समाजात निम्न दर्जाचे स्थान होते .  संपुर्ण स्त्री जात ही दास्यत्वात अडकलेली होती . किंबहुना स्त्रियांना स्वतःला मात्र याची जाणीवही नव्हती . त्याचे मूळ त्यांच्या अज्ञानात आहे . त्यांना  पुरुषी समाजव्यवस्थेने शिक्षणापासून दूर ठेवले आहे . त्याचे कारण त्यांना आपल्या समाजातील स्थान समजू नये .तसेच मानवी हक्कांची जाणीव होऊ नये असे स्पष्ट मत महात्मा फुलेंचे होते . त्या शिकल्या तर त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाची जाणीव होईल .स्त्रिया समाजातील या रुढी, प्रथा, परंपराविरुद्ध बंड करून जुलूम मोडीत काढतील . याची जाणीव त्यांना होती म्हणूनच त्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.

 *४ . स्त्रीची सहनशीलता* -मातृसत्ताक कुटुंब पद्धतीचा ऱ्हास झाल्यानंतर संस्कृतीचा उदय झाला

.स्त्री कुटुंबात पुरुषासोबत राहते .परंतु ती खूप निरपेक्ष भावनेने प्रेम करत राहते .त्यामुळे तिला पुरुषाचे छक्केपंजे कळत नाहीत आणि कळाले तरी ते छक्के पंजे मोडीत काढण्याचे धाडस ती करत नाही . गुपचूप मनातल्या मनात धुमसत अन्याय सहन करत राहते म्हणून स्त्री अबला आहे असे महात्मा फुले म्हणतात .याशिवाय तत्कालीन समाजातील स्त्रीची परिस्थिती विशद करताना महात्मा फुले म्हणतात की , " कित्येक  व्यसनी पुरुष पवित्रतेचा पोकळ आव आणणारे , अतीनिर्लज्ज आर्य, आपल्यातील अबला व पंगु भावजया व सुना ,तारुण्याच्या भरात आल्यावर त्यांचा रात्रंदिवस पाठलाग इतका  करितात की त्यांची सहजच आडमार्गी पावले पडतात, असे झाले म्हणजे त्यास अब्रूकरिता नाइलाज होवून गर्भपात  करून  बाळहत्या कराव्या  लागतात .

     स्त्रीची  वास्तव परिस्थिती समजून घेऊन ते विशद करताना महात्मा फुले स्त्री चा माणूस म्हणून सांगोपांग विचार करतात हे लक्षात येते . महात्मा फुले हे समाजातील दृष्ठे, कर्ते, कृतिशील विचारवंत होय .शूद्रातिशूद्राप्रमाणेच स्त्रीची परिस्थिती अचूक ओळखून महात्मा फुले यांनी स्त्री विषयक कार्य करताना ...

 १ .स्त्रीशिक्षण 

२ .विधवा पुनर्विवाह आणि ३ .बालहत्या प्रतिबंधक गृह 

या बाबींवर प्रामुख्याने केलेल्या आहेत .


 *१ . स्त्री शिक्षण*-मुलांना घडविण्याचे कार्य घरातील स्त्री करत असते . स्त्री जर शिकली तर सर्व अनार्थाचे मूळ नष्ट होईल . कुटूंब समाज घरातल्या स्त्री मुळे शिकेल . समाज परिवर्तन  वेगाने घडून येण्यास मदत होईल, हे महात्मा फुले जाणत  होते .त्यामुळे स्त्रियांच्या शिक्षणासाठी १९४८ साली मुलींसाठी पुण्यात पहिली  शाळा काढली .या शाळेत अस्पृश्य  मुलींनाही शिक्षण  दिले जायचे . यापुर्वी कित्येक शतकांपासून स्त्री शिकली नव्हती . त्यामुळे मुलींना शिकवण्यासाठी शिक्षिका मिळणे अशक्य होते . या परिस्थितीवर मात करण्यासाठी जोतीबांनी स्वतःच्या पत्नीला ,सावित्रीबाईंना शिकवले आणि या शाळेत मुलींना शिकवण्याचा प्रेरित करतात. या संदर्भात डॉ . नागनाथ कोतापल्ले म्हणतात, "ज्या काळात शूद्रादी अतिशूद्र पुरुषांनीच विद्या घेणे हे धर्मबाह्य मानले जात होते व श्री वर्गासाठी शाळा उघडली हे त्या काळातील समाजाच्या दृष्टीने भयानक कृत्य होते त्यामुळे तत्कालीन परिस्थितीत मुलींना शिकवण्यासाठी शिक्षिका मिळणे शक्यच नव्हते अशा अवस्थेत महात्मा फुले यांनी आपल्या पत्नीला शिक्षणाचे धडे देऊन शिक्षिका बनविले .(. ५ . लेख -म . जोतीराव फुले यांचे योगदान . शिवाजी सिरसाठ . _राष्ट्रीय चर्चासत्र : समाजसुधारकांचे मराठी साहित्याला योगदान पा नं ८३ )

          डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले म्हणतात त्याप्रमाणे तत्कालीन समाजाच्या दृष्टीने मुलींसाठी शाळा काढणे , मुलींना शिकवणे . हे भयानक कृत्य होते . सनातनी  लोकांना ही गोष्ट धर्माच्या व सामाजिकतेच्या   विरोधातील   आहे असे वाटले . त्यामुळे शाळेत जाता-येता सावित्रीबाईंना लोकांचे शेणगोळे , शिव्याशाप खावे लागले .प्रसंगी जोतिबा सावित्रीला वडिलांच्या घरातून बाहेर पडावे लागले . जोतीबांनी 1948 साली काढलेली पहिली मुलींची शाळा बंद पडली  पण महात्मा फुले डगमगले नाहीत .महात्मा फुले यांनी १८५१ मध्ये बुधवार पेठेत दुसरी मुलींची शाळा काढली .त्यानंतर १८५२ मध्ये .रास्ता पेठेत तिसरी शाळा काढली .या कार्याला सुस्वरूप प्राप्त होण्यासाठी फुले यांनी आपल्या मित्रांच्या सहाय्याने एक समिती स्थापन केली या कार्याला काही एतद्देशीय लोकांनी सहकार्य केले व ज्योतीबांच्या या कार्याबद्दल त्या काळच्या शासनाने त्यांचा विश्रामबाग येथे सत्कार केला . यामुळेच विसाव्या शतकातील अनेक सामाजिक चळवळींचा आणि स्त्री शिक्षण चळवळीच्या महात्मा फुले हे आरंभबिंदू ठरतात .

* विधवा पुनर्विवाह : समाजामध्ये स्त्रियांचे निम्न दर्जाची स्थान आणि स्त्रियांची एकूणच अवस्था ही महात्मा फुल्यांना अस्वस्थ  करून जात होती .यामुळे त्यांनी महिलांना शिक्षण देणे सुरू केले. परंतु प्रश्न एवढ्यावरच सुटणारा नव्हता . शिक्षणाने स्त्री समर्थ होण्यास अनेक वर्ष लोटावी लागणार होती परंतू त्या काळात अनेक बालिकांचे लग्न वृदध पुरुषांशी / विधूरांशी  लावले जात . कायद्याने सतीची चाल बंद झाल्यामुळे काही प्रमाणात का होईना पती निधनानंतर सती जाणे  कमी झाले होते . परंतु विधवांना समाजात मानाचे स्थान नव्हते .विधवांचे जगणे म्हणजे जिवंतपणी मरण यातना  होत्या . त्यांचे दर्शन अशुभ मानले जाईल विधवांना कोणतीही धर्मकार्य निशिद्ध होते . कोणत्याही शुभ कार्यामध्ये विधवांना प्रवेश नव्हता . विधवांनी एखाद्या अंधार्‍या खोलीत रहावे . शक्यतो कोणाच्या नजरेस पडू नये, पायात चपला घालू नये . अत्यंत साधे जेवण घ्यावे . एकांतात जीवन कंठावे . मनाचे कोणतेही लाड पुरवू नयेत किंवा स्वतःच्या मनाचा कोंडमारा करूनच जगावे  अशा अनेक बाबींमुळे विधवांना अत्यंत दयनीय अवस्थेत जीवन कंठावे लागत होते .हे स्त्रियांचे हाल महात्मा ज्योतिबा फुले यांना पाहवत नव्हते . विधवांचे हाल थांबवण्यासाठी आणि स्त्रियांना समाजात प्रतिष्ठित स्थान प्राप्त होण्यासाठी महात्मा फुलेंनी विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला . इसवीसन १८६४ मध्ये पुण्यातील गोखले बागेत एक विधवा पुनर्विवाह घडवून आणला. या विवाहाद्वारे विधवांचे जीवन सुकर करता येऊ शकते . हा नवीनच विचार फुलेंनी समाजात रूजवला .  यासाठी त्यांना अनेक समाजकंटकांना रोषाला सामोरे जावे लागले .परंतु महात्मा फुले हे कधीही डगमगले नाहीत त्यांचे विचार त्यांनी स्वतःच्या कृतीत उतरविले . 

 *३ तरुण विधवांच्या समस्या आणि जोतीबा*- बालपणातच तारुण्यात विधवा  होणाऱ्यांची संख्या ही वृद्धापकाळी होणाऱ्या स्त्रियांच्या तुलनेत जास्त होती आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर किंवा ऐक तारुण्यात विधवा होणा -या स्त्रियांवर घरातील , समाजातील आणि -- अगदी नातलग असणाऱ्या  पुरुषांच्याही  वाईट नजरा असत .विधवा झाल्यामुळे त्या आधारहीन झालेल्या असत . मानसिक रित्या या स्त्रिया प्रचंड खचलेल्या असतात .माणसे आधार हव्या  असलेल्या या महिला या पुरुषी प्रवृत्तीला बळी पडल्यास त्यांना सामाजिक रोषाला बळी पडावे लागे . सामाजिक दृष्ट्या त्यांची परिस्थिती आणखीनच वाईट होत असे .समाजाकडून होणारी अवहेलना टाळण्यासाठी या स्त्रियांना भ्रूण हत्या आणि आत्महत्या कराव्या लागत . हे टाळण्यासाठी महात्मा फुलेंनी आपल्या घराशेजारीच बाल हत्या प्रतिबंधक गृह .१८६३ . मध्ये काढले .यासंदर्भात महात्मा फुलेंनी सर्वत्र माहितीपत्रके वाटली . त्यातील मजकूर " विधवांनो इथे येऊन  सुरक्षित बाळंत व्हा . तुम्ही आपले मूल न्यावे किंवा ठेवावे हे तुमच्या खुशीवर अवलंबून आहे .त्या मुलाची काळजी हा अनाथाश्रम घेईल . " असा होता .. ( ६ .प्रा . शशिकांत पवार यांचा लेख - राष्ट्रीय चर्चासत्र : समाजसुधारकांचे मराठी साहित्याला योगदान )अशा रीतीने महात्मा फुले दृष्ट्या  समाजसुधारकाने  भारतातील पहिले बालहत्या प्रतिबंधक गृह काढले.

अशा रितीने काळाच्या पुढे जावून वास्तववादी विचार करणारे महात्मा फुले हे कर्मयोगी होते . आज महिलांची होत असलेली प्रगती स्वातंत्र्य आणि आजच्या . स्त्री पुरुष संबंध सुधारणांचे श्रेय महात्मा फुलेंना जाते . .


संदर्भ सूची -१ . महात्मा फुले समग्र वाङमय ,प्रथमावृत्ती १९९६ प्रस्तावना प्रस्तावना पान क्रमांक १६ .

२. महात्मा फुले समग्र वाङमय ,प्रथमावृत्ती प्रस्तावना पान  क्रमांक १७

३. सार्वजनिक सत्यधर्म पान क्रमांक ९ ते १३

४. सत्यधर्म पान क्रमांक १० व ११

५.लेख- महात्मा ज्योतिराव फुले यांचे योगदान लेखक - शिवाजी शिरसाट 

राष्ट्रीय चर्चासत्र समाजसुधारकांचे मराठी साहित्याला योगदान पान क्रमांक ८३ .

६ . प्रा . शशिकांत पवार यांचा लेख -महात्मा फुले यांचे विचार व कार्य 

राष्ट्रीय चर्चासत्र - समाजसुधारकांचे मराठी साहित्याला योगदान पान क्रमांक १२३

**** 

डॉ. संजय बोरुडे, अहमदनगर यांची म.ज्योतिबा फुलेंवरच्या गाजलेल्या कवितेची यू ट्यूब लिंक :

https://youtu.be/1LKnVE3KIVA

मंगलवार, 24 नवंबर 2020

मनोहर सोनवणे नावाचा माणूस

  मनोहर सोनवणे नावाचा माणूस



१.

मनोहर सोनवणे नावाचा माणूस

१.

२००३  मध्ये 'यूनिक फीचर्स'मधे जॉईन झालो होतो. तिथं एका टेबलवर इनशर्ट केलेली, चेहर्यावर कोडाचे पांढरे डाग असलेली, डोक्यावरचे केस बहुधा कोडानेच पांढरे झालेली एक व्यक्ती सतत खाली मान घालून sincerely काम करताना दिसायची... तसे असले तरी, ऑफिसमधे कुठे हास्यविनोद झाला तर त्यात भाग घेऊन मधेच एखादा विनोदी चुटका करुन हास्यविनोदात भर घालायची. अगदी ऑफिसबॉयवरही रागवताना मी त्या व्यक्तीला फारसं पहिलं नाही. त्या व्यक्तीशी हळूहळू मैत्री झाल्यानंतर आधीच्या साठे बिस्किट या कंपनीच्या नोकरीतील अनुभव वारंवार सांगायची- ती व्यक्ती म्हणजे मनोहर सोनवणे.


हळूहळू त्यांच्याशी माझी wavelength जुळली. तेव्हा यूनिक फीचर्स मधे इतर छोट्या मोट्या कामांसोबतच 'मैत्रिण', 'भटकंती' आणि 'अनुभव' या मासिकांची कामे चालत. त्यातील भटकंतीचे काम मनोहर सोनवणे, तर मैत्रिणचे काम हे मुकुंद ठोंबरे, शुभदा चंद्रचूड यांच्यासह पाहायचे. या दोन्ही अंकांचे फायनल काम एक- दोन दिवसांच्या फरकाने पूर्ण व्हायचे. तेव्हा रात्री उशिरापर्यंत आम्ही सर्वजण थांबायचो. मात्र उशिरा थांबण्याबद्दल त्यांनी कधी फारशी कटकट केली नाही. कारण त्यांना काम बिनचूक व्हावे असे वाटायचे, आणि त्यांचे काम बिनचूक व्हायचेही...


अनुभव या मासिकाचे संपादक आणि यूनिक फीचर्सचे संचालक सुहास कुलकर्णी आणि आनंद अवधानी सर हे तर मला म्हणायचे 'सोनवनेंची खात्री झाली असेल तरच अंक प्रिंटला सोडा'. सोनावणे यांच्या संपादनाचा हात फिरला कि ओबडधोबड लेखाला छान आकार यायचा. सोनवणे अनुभव मासिकाचे कार्यकारी संपादक होते. 


त्यांच्या संपादनाची खरी झलक अनुभवास आली ती 'स्टोरी ऑफ द डेमॉक्रसी इन साऊथ एशिया' या पुस्तकाच्या अनुवादाच्या निमित्ताने... ते पुस्तक युनिक फीचर्स च्याच समकालीन प्रकाशनाने 'लोकशाही झिंदाबाद' या नावाने प्रकाशित झाले. अतिशय अवघड असे अकॅडेमिक पुस्तक त्यांनी सर्वसामान्य वाचकाच्या वाचन क्षमतेच्या आवाक्यात आणले. तेव्हा सर्वजण त्यांच्यावर बेहद्द खुश झाले होते. मूळ पुस्तकाचे एक लेखक सुहास पळशीकरांनी फोन करून त्यांचे त्याबद्दल कौतुकही केले. असेच काम त्यांनी प्रकाशवाटा, महाराष्ट्र दर्शन, खरेखुरे आयडॉल, देवाच्या नावाने अशा अनेक पुस्तकांवर केले. इतकेच काय पण 'यांनी घडवले सहस्रक', आणि 'असा घडला भारत' यासारख्या पुस्तकांच्या अवाढव्य कामात सोनवणे यांचे योगदान दुर्लक्षून चालणार नाही. सुहास कुलकर्णी आणि त्यांची त्याबाबत छान wavelength जुळली होती.  


कालांतराने मी युनिक फीचर्स मधून बाहेर पडलो. 'आर्ट ऍडव्हर्टायझींग' ही संस्था सुरु केली. त्यामार्फत स्वतःचे डिझायनिंगचे काम करत असताना एखादे नियतकालिक सुरु करावे असे मला आणि माझी पत्नी अमृता खेतमर हिला वाटू लागले. त्यादिशेने आम्ही पावलं उचलली. दरम्यान सोनावणे यांची भेट होऊन त्यांनीही त्या उपक्रमात सहभागी होण्यास सहमती दर्शवली. लवकरच 'पुणे पोस्ट' या नावाने आमचे साप्ताहिकाचे काम सुरु झाले. सोनवणे अंकाचे संपादक झाले.. आमच्या टीम वर्कमुळे अंक बहरला.. जवळपास दीड-दोन वर्षे हे काम चालले. नंतर माझ्या काही अडचणींमुळे मला साप्ताहिक स्वरूपात ते चालवणे अवघड होऊ लागले. त्यामुळे आम्ही ते पाक्षिक केले. त्यातही येनकेन प्रकारे विघ्न येत राहिली. मात्र गेली आठ वर्षे आम्ही दर्जेदार दिवाळी अंक प्रकाशित केले. शिवाय साप्ताहिकाचे आणि पाक्षिकाचे जे काही अंक केले त्याला महाराष्ट्र भरातून भरभरून प्रतिसाद मिळाला. अर्थात, त्यात सोनावणे सरांचे योगदानही तितकेच महत्वाचे ठरते. या काळात आम्ही अनेक प्रकाशन संस्थांसाठीही कामे केली. नंतर सोनवणे यांना विश्वकर्मा पुब्लिकेशन कडून संपादक पदाची ऑफर आली. तिथेही त्यांनी समरसून काम करत तिथल्या मराठी विभागाला छान आकार दिला. दोन वर्षांपूर्वी सौम्य हृदयविकाराच्या झटक्यानंतर ते घरून काम करीत आहेत. 


सोनवणे सर यांचा कवी-लेखक म्हणून विचार करायचा झाला, तर त्यासाठी आधी त्यांचा 'सदरा बदललेली माणसं' हा ललित संग्रह (अनुभव मासिकात प्रकाशित झालेले ललित लेख) वाचावा. शिवाय त्याच पुस्तकातील वसंत अबाजी डहाके यांची प्रस्तावना आवर्जून वाचावी. ती प्रस्तावना सोनावणे यांच्यातील साहित्यिक मूल्यांबद्दल खूप काही सांगून जाते. या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कारही लाभला. त्यांचा पहिला कविता संग्रह 'एक शहर सूनसान' हाही तितकाच महत्वाचा... पण काहीसा दुर्लक्षित. ज्यांना सकस कविता ऐकायची असेल त्यांनी सोनवणे यांचीही कविता एकदा आवर्जून ऐकावी-वाचावी. मनोहर सोनवणे हे कवी वर्तुळात सर्व महत्वाच्या कवींशी चांगले संबंध ठेवून आहेत. मुळात फारसे न बोलणारे, स्वस्तुतीपासून दूर राहण्याचा स्वभाव असलेले सोनवणे साहित्यिक म्हणून दुर्लक्षित राहिल्याचे दुःख आधी वाटायचे.. मात्र अलीकडे त्यांनी 'पुणे पोस्ट'सह अन्य महत्वाच्या दिवाळी अंकात काळाचे वेगवेगळे टप्पे वेगवेगळ्या लेखातून खुमासदार शैलीत मांडण्याचा प्रयत्न केला, तो प्रयत्न सर्वांना खूप भावला. पुढे त्याचे पुस्तक करण्याचा त्यांचा मानस आहे. त्याचबरोबर जालियनवाला बाग हत्याकांडावरील पुस्तकाचे कामही बऱ्यापैकी उरकत आणले आहे. समकालीन प्रकाशनाच्या शशी थरूर यांच्या नेहरूंवरील 'शोध नेहरूंचा आणि भारताचाही' या पुस्तकाचा त्यांनी केलेला अनुवादही छान जमला आहे. एकंदर येत्या काळात येणारी त्यांची पुस्तके साहित्य वर्तुळात त्यांची दुर्लक्षित राहिलेली प्रतिमा स्थिर करतील यात शंका वाटत नाही. 


सोनवणे यांचा आणखी एक गुण म्हणजे ते आमच्यासारख्या तरुणांसोबत मिळून मिसळून छान काम करतात. आमच्या उत्साहाला त्यांच्या अनुभवसंपन्न सल्ल्याने काही प्रमाणात योग्य दिशा देण्याचे काम करतात. 


त्यांच्या कामाची यादी खूप मोठी होईल परंतु मला जशी आठवली तशी मी इथे सांगितली. त्यांचे साहित्यिक क्षेत्रासाठीचे योगदान मोठे आहे. त्याची दखल घेणे आता आवश्यक आहे. 


त्यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! आणि त्यांच्या सर्व संकल्पित उपक्रमांना सदिच्छा


- प्रदीप खेतमर


२.


*आता घोड्यांच्या टापांना आवाज आहे*

*दिशा नाही* 

*तुझी खोल आतून उमटणारी* *आर्त साद आहे*

*प्रतिसाद नाही*    


80 च्या दशकात कुठल्यातरी कविसंमेलनात ही कविता ऐकली आणि स्तब्धच झाले . कवीचं नाव होतं *श्री मनोहर सोनवणे* . 

  

" आम्ही  तापतो तेव्हा पेटून उठतो 

आणि थंड होताच गोठून जातो  .. " 


अशा ज्वलंत तरीही आतल्या आवाजातील  ओळी लिहिण्यासाठी तुमच्या  आत समाजमनाविषयीचे खोल आकलन आणि समज हवी ,समाजाविषयी खोल   आस्था हवी . ही समज सोनवणे यांच्या प्रत्येक कवितेत नंतर जाणवत गेली . प्रथमदर्शनीच  एक कवी म्हणून त्यांच्याविषयी आदर आणि मित्रत्वाचं नातं निर्माण झालं . 


मनोहर सोनवणे यांचा आज  एकसष्टावा वाढदिवस . या निमित्ताने  80 - 90 पासून आम्हा पुण्यातल्या कवींचा झालेला  साहित्य क्षेत्रातला सहप्रवास  डोळ्यांसमोरून सरकत गेला . 


सोनवणे एक चांगले कवी , उत्तम कथाकार , आणि  एक बेहतरीन  संपादक  आहेत . ' एक शहर सुनसान ' हा त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित आहे .' सदरा बदललेली माणसं '  सारखं  ललितलेखन त्यांच्या नावावर आहे . जालियनवाला बाग हत्याकांडाविषयीचा त्यांनी अभ्यासलेला  काही  दुर्मीळ इतिहास आणि 70 - 80 च्या दशकापासून देशात , महाराष्ट्रात घडलेल्या घडामोडींमुळे  बदलत गेलेला भोवताल , बदलत गेलेलं सामान्य माणसांचं जगणं याविषयीचं त्यांचं भाष्यात्मक ललित तसंच त्यांच्या कथा  पुस्तकरूपाने येण्याची वाट बघतायत . 

कथा , कविता , ललित असो वा संपादन ... खोल वैचारिक बैठक आणि अभिव्यक्तीचा समकालीन ,प्रगल्भ  अंदाज हे त्यांच्या सर्वच लेखनाचं वैशिष्ट्य असतं . संपादनासाठी त्यांच्या हाती आलेल्या पुस्तकाचं ते सोनं करतात . 


बरचसं अंतर्मुख आणि काहीसं संकोची व्यक्तित्व असलेल्या या आपल्या सर्वांच्या कविमित्राला एकसष्टीनिमित्त खूप खूप शुभेच्छा . 


- अंजली कुलकर्णी 

24 नोव्हेंबर 2020

रविवार, 15 नवंबर 2020

द बॅड, एंजल आय, ली व्हान क्लीफ : अतुल ठाकूर

द बॅड, एंजल आय, ली व्हान क्लीफ!




द बॅड म्हणुन काम केलेला “द गुड द बॅड अँड द अग्ली” मधील एंजल आय ली व्हान क्लीफ हा माझा अत्यंत आवडता अभिनेता. भिंगातुन सुर्यकिरण एकत्र होऊन कागदाला भोक पडावं तशी आरपार भेदुन जाणारी तीक्ष्ण नजर हे व्हान क्लीफचं बलस्थान. त्यातुन सर्जीयो लिऑनसारखा क्लोजअपवेडा दिगदर्शक मिळाल्यास पाहायलाच नको. सर्जियोने या नजरेचा वापर करुन पडद्यावर अनेकदा जाळ पेटवला आहे. उंचीपुरी देहयष्टी, त्याला सजेसा वेस्टर्नपटातील तो पोशाख. ओठात पाईप पकडुन व्हानक्लीफ पडद्यावर आला की बाकीचे सारे काहीवेळ धुसर वाटु लागतात. त्याचं आगमनच स्क्रीन व्यापुन टाकणारं असतं. हे जणुकाही कमीच म्हणुन की काय त्याचा तो बसकट, काहीसा खर्जातला धडकी बसवणारा आवाज. तो बोलु लागल्यावर तो आवाज आणि ती नजर प्रेक्षकांना खिळवुन टाकते. एकुणच व्यक्तीमत्वाचा प्रभाव जबरदस्त. सर्जिओ लिऑनने “फॉर अ फ्यु डॉलर्स मोअर” मध्ये देखिल व्हान क्लीफ च्या या नजरेचा अत्यंत परिणामकारक वापर केला आहेच. मात्र त्याबद्दल स्वतंत्र लिहावे लागेल. कारण ती भुमिका सकारात्मक आहे. “द बॅड” व्हान क्लीफ हा फार वेगळ्या तर्‍हेचा व्हिलन आहे.



व्हान क्लीफच्या “द गुड द बॅड अँड द अग्ली” मधील एंट्रीला इनिओ मोरीकोनने असं काही पार्श्वसंगीत वापरलं आहे कि या माणसाच्या येण्याने भयंकर वादळ येणार आहे याची प्रेक्षकाला चाहुल लागावी. त्यानंतरचे दृश्य हे चवीचवीने पाहण्याजोगे. सर्जियोचे टाईट क्लोज अप्स आणि वेस्टर्नपटातील ते रापलेले चेहरे. व्हान क्लीफ घोड्यावरुन उतरतो आणि कॅमेरा त्याच्या चेहर्‍यावर स्थिर होतो. त्यावेळी दिलेलं पार्श्वसंगीत भयंकराच्या आगमनाची वर्दी देणारे आहे. व्हान क्लीफची दारात उभे राहण्याची पद्धत आणि त्यानंतर त्याचे ठामपणाने पावले टाकत येणे फक्त एकच सुचवते की हा माणुस काहितरी ठरवुन आला आहे. घरमालक आपल्या लहान मुलाला जेवणाच्या ताटावरुन उठवतो आणि बायकोला देखिल नजरेनेच आत जायला सांगतो. दुबळ्या प्राण्याला आपला मृत्यु समोर दिसावा त्याप्रमाणे त्याच्या हालचाली सुरु असतात. बराचवेळ कुणीचे काही बोलत नाही. व्हान क्लीफ समोरच्यावर आपली धारदार नजर रोखुन टेबलावरील अन्नाचा समाचार घेऊ लागतो. आणि मग समोरच्याला व्हानक्लीफची ती नजर जणु असह्य होते आणि तो बोलु लागतो. व्हानक्लीफ त्याला मांजराने उंदराला मारण्याआधी खेळवावं तसा खेळवतो. हवी ती माहीती मिळाल्यावर ठार मारतो. त्याच्या मुलालाही सोडत नाही. आणि ज्याच्याकडुन पैसे घेतले त्यालाही ठार मारुन दडवलेल्या संपत्तीच्या मागावर स्वतःच बाहेर पडतो. या दृश्याचं जास्त वर्णन करीत नाही कारण ते प्रत्यक्ष पाहायलाच हवं. व्हान क्लीफचा आवाज, त्याची बोचरी शोधक आणि भेदक नजर, त्याने विद्युतवेगाने केलेल्या हालचाली आणि त्याला साथ आहे तितक्याच तोलाच्या पाश्वसंगीताची. सर्जिओ लिऑनच्या समोर व्हान क्लीफसारखा माणुस आल्यावर काय चमत्कार घडु शकेल याचे प्रात्यक्षिकच या दृश्यात दिसुन येते.




पुढे चित्रपट एखाद्या महाकाव्याचे सर्ग वाचल्याप्रमाणे पुढे सरकतो. सर्जिओच्या वेस्टर्नपटात डोंगर दर्‍या, खुरटी झुडपं, पॅनोरमिक ऐसपैस पसरलेली मैदाने, त्यातुन दौडत असलेले घोडे, त्यावरील रापलेल्या चेहर्‍यांची, फट म्हणता पिस्तुले काढणारी माणसे यांची रेलचेल असते. वेस्टर्न पटाच्या कठोर पार्श्वभुमीवर खलनायकदेखिल तसाच असायला हवा होता आणि व्हान क्लिफने ती जागा घेऊन “एंजल आय” ला अमर करुन टाकले. दडवलेल्या संपत्तीच्या शोधात तो सावजाच्या मागावर निघावं त्याप्रमाणे निघतो. आपल्या सैन्यातील पदाचा दुरुपयोग करायलाही हा मागेपुढे पाहात नाही. अतिशय थंड, हिशेबी आणि आपल्या हेतुबाबत पूर्णपणे नि:शंक असलेला हा एंजल आय खरं म्हणजे प्रेक्षकांना मनातुन आवडुन जातो. त्यानंतरचा अतिशय मह्त्वाचा सीन म्हणजे टुको कढुन माहिती काढणे. इलिया वलाचने टुको, द अग्लीची भुमिका झकासच वठवली आहे. प्रेक्षकांना अतिशय आवडलेली, विनोदाची झाक असलेली ही भुमिका. अशा या टुकोच्या चलाखिला व्हान क्लिफ फसत नाही. त्याच्या कडुन माहिती मिळण्यासाठी ज्या तर्‍हेच्या क्रौर्याची वापर व्हान क्लिफ थंडपणे करतो ते पाहुन अंगावर शहारे येतात. हे एकुणच दृश्य अतिशय हिंसक आहे.


शेवटचा सीन तर चित्रपटाचा कळसच आहे. मात्र त्यातदेखिल बाजी मारुन जाते ती व्हान क्लिफची नजर. क्लिंट इस्टवूड शेवटपर्यंत ज्या थडग्यात संपत्ते दडवलेली आहे त्या थडग्यावरचे नाव उघड करत नाही. बंदुकीच्या जोरावर संपत्ती मिळणार नाही त्यासाठी तिघांना एकमेकांशी लढावे लागेल हे तो दोघांनाही शांतपणे सांगतो. त्यानंतर सुरु होतो तो जिवन मरणाचा लढा. यावेळी मोरीकोनीचे संगीत तीव्र होत जातं आणि व्हान क्लिफची नजरदेखिल. पुढे काय घडतं हे सर्वांना माहितच आहे. ज्यांना माहित नाही त्यांनी ते आवर्जुन पाहावं असं आहे. क्लिंट इस्टवूडचा “द गुड” ब्लाँडी, इलिया वलाचचा “द अग्ली” या भावखावु भुमिका आहेत. प्रेक्षक त्या मनापासुन एंजॉय करतातच पण व्हान क्लिफ फ्रेममध्ये आल्याबरोबर प्रेक्षक सावरुन बसतात. कारण हे काम सिरियस आहे, आता काहीतरी घडणार आहे असेच वातावरण तयार होते. व्हानक्लीफचा एंजल आय हा चित्रपटाच्या इतिहासातील वेगळा खलनायक गणला जायला हवा. अत्यंत हिशेबी, थंड डोक्याचा, सावजाच्या मागावर चिकाटीने असलेला, काम साधण्यासाठी कुठल्याही थराला जाणारा असा हा खलनायक आहे. हे करताना एक “नो नॉनसेन्स” तर्‍हेचा वाईट माणुस स्क्रीनवर उभा राहतो. आणि विद्युतवेगाने पिस्तुल काढुन अचुक नेम साधण्याची क्षमता असलेल्या या माणसाशी मुकाबला करण्यासाठी त्याच्यासारख्याच नेमबाज अशा दोघांना एकत्र यावं लागतं यातच त्या भुमिकेची ताकद दिसुन येते.


पुढे व्हान क्लिफचे अनेक चित्रपट पाहिले. काही आवडले. मात्र नकारात्मक भुमिकेत मला अतिशय आवडलेला असा हा एकमेव “एंजल आय”च. मला आजही असं वाटतं की व्हान क्लीफच्या प्रतिभेला योग्य न्याय देणार्‍या भूमिका त्याच्या वाट्याला फार कमी आल्या. विधात्याने हॉलिवूडसाठी ली व्हान क्लीफ हे रसायन एकदाच तयार केलं. तसा अभिनेता पुन्हा होणे नाही.

- अतुल ठाकुर


अतुल ठाकूर यांनी हा लेख इथे पोस्ट करण्यास परवानगी दिल्याबद्दल त्यांचे आभार.. संपादक : साहित्याक्षर

ली व्हान क्लिफची वैयक्तिक माहिती पुढील लिंकवर :

https://en.m.wikipedia.org/wiki/Lee_Van_Cleef

you tube link for the movie :

The Good , The bad & The Ugly is

https://youtu.be/U6txc_4S-aI