सोमवार, 4 मई 2020

सोशल मिडिया आणि 'ती' - संदीप नाझरे
































'बघ ना, तुझ्यासाठी गजरा आणलाय !'
"अय्या खरंच?" म्हणत ती मोबाईल टेबलवर ठेवून गजरा केसात माळायला कपाटाच्या आरशासमोर जाते. इतक्यात तिच्या मोबाईलवर मेसेंजरची टिकटिक सुरू होते. शर्टाची बटने काढता काढता नवरा तिचा मोबाईल घेऊन मेसेंजर उघडतो.
'हाय',  'डिअर', 'बोल ना', 'ऑनलाइन तर दिसतेयस्' 'फिलींग अलोन डिअर' 'आपण भेटूया का?' 'तुला कधी वेळ असतो?'
हे अनोळखी व्यक्तीचे मेसेज बघून त्याचा पाराच चढतो. इतक्यात आज पनीरचा बेत करणार असल्याचे सांगत ती येते. पण हा रागाने लालबुंद. फक्त बघत राहतो. तो काय बोलत नाही म्हणल्यावर हि त्याच्या हातातील मोबाईल घेऊन मेसेज बघते.
 'माय गॉड, याची फ्रेंड रिक्वेस्ट तर मी आत्ताच तू गाडी पार्क करत होतास तेव्हा स्विकारलेली!'
त्याचा प्रतिप्रश्न,
'जुनी ओळख असेल ना..?'
नवरा संशय घेतोय याचा आता तिला धक्का. ती रडतच,
'तुमचे सगळे मित्र म्युच्युअल फ्रेंड दिसतायत म्हणून तुमचे फ्रेंड असतील म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट अँक्सेप्ट केली!'
मेसेज टाईम आणि मित्रयादी तपासल्यावर मग कुठे ह्या नात्यावर घोंगावणारे वादळ थांबते.
     'दिदे, मला तुझा मोबाईल दे ना जरा. माझा डाटा संपलाय, नवीन मुव्ही डाऊनलोड करतोय, एचडी प्रिंट आहे बघ!'
कॉलेजमधून येत असलेली दिदी कालच बर्थडे गिफ्ट मिळालेला नवाकोरा मोबाईल भय्याच्या हातात ठेवून चेंज करायला जाते.
हा स्क्रीन ऑन करतो तर सेव नसलेल्या नंबर वरून व्हाट्सअप्प नोटिफिकेशन येतात.
तो सहज उघडून बघतो तर,
'हॅलो' 'तू मला खूप आवडतेस गं' 'उद्या क्लास नंतर कॉफी शॉप मध्ये भेटूया का?' 'ऑनलाईन दिसतेयस मग रिप्लाय का देत नाहीस?' 'किती दिवस तुझा व्हाट्सअप्प नंबर मिळत नव्हता, आज त्या नेहा कडून घेतलाच.'
आता काल दिदीच्या बर्थडेला खास सेव केलेल्या पॉकेटमनीतून घेतलेल्या अँड्रॉइड मोबाईलवर हे मेसेज बघून भय्याच्या डोक्याचा भुगा झाला.
तर आणखी एका विवाहित मैत्रीणीचा अनुभव काटा आणणारा आहे.
माझा पती रोज मी झोपायची वाट बघतो मी झोपले की रात्री एक नंतर याचं फेसबुक चॅटींग सुरू.. तो तिला भेटलाय ही.. तिने याच्या कडून पैसेही उकळल्याचं त्यांचं चॅटींग चोरून वाचल्यावर समजलं. याचं वय कुठं, तिचं वय कुठं.. जरा तरा तरी..
आणि लग्न झाल्यास, मला कधी उशीरा आल्यावर 'काही खाल्लं का? विचारलं नाही' तर ही कुठली कोण लागून गेली,
'ब्रश केलास का? चहा पिला का, नाष्टा काय केलास ? जेवलीस का?'
ह्यांना एवढ्या चौकशा कशाला हव्यात? काय करावे सुचत नाही.  आणखी एक घटना,
    'अरेच्चा एवढा मोठा बील्डर मला रिक्वेस्ट पाठवतोय!' म्हणत तिने रिक्वेस्ट स्विकारली.
'हाय' 'जेवण झालं का?'
हा माझ्या जेवणाची का चौकशी करतोय बघ.
'हॅलो' 'रात्री किती वाजता झोपतेस? मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं!'
मग तिने त्याला सरळ ब्लॉक करून टाकले.
तर काही घटना या पुढेही जाणाऱ्या ठरतात.
'हाय' 'तुम्ही खुप छान रेसेपी बनवता' 'तुमच्या पोस्ट मी डेली फेसबुक, व्हाट्सअप्पवर शेअर करतोय. मला एकदा तुमच्या हातची चव चाखायची आहे. हरकत नसेल तर मला तुमचा पत्ता द्याल का?'
एकाच शहरातील दोन वर्षे जूना नेहमी लाईक, शेअर, कमेंट करणारा फेसबुक फ्रेंड म्हणून ती त्याला पत्ता देते. तर साहेब दुसऱ्या दिवशी घरी. खाणंपिणं राहिलं बाजूलाच हा हाताची चव चाखायची म्हणतो म्हणल्यावर ही हातात लाटणं घेते आणि त्याला पळवून लावते.
*असे लंपट सर्वच क्षेत्रात दिसतात. एक नवोदित कवयित्री रोज आपल्या काही ओळी फेसबुक वर पोस्टत असते. त्यातून जिल्ह्यातील एका नव्यानं सुरु झालेल्या दैनिकाच्या संपादकाशी ओळख होताच तो तिला कविता अंकात छापल्याचं कटींग पाठवून ओळख वाढवू पाहतो. तिचा फोन नंबर मागून घेऊन डायरेक्ट तिच्या शहरात पोचतो. ती भेटायला नाही म्हणाली तरी तिला मेसेंजर वरून व्हिडिओ कॉल करतो. पंचवीस वर कॉल कट केल्यावर ती वैतागून त्याला ब्लॉक करते. घरी सांगावे तर घरातले मोबाईल काढून घेतील. पुन्हा मोबाईल वापरायला मिळणार नाही. या भितीने तीच काय अनेक मुली आपल्या घरात सोशल मीडियावर येणारे आपले अनुभव शेअर करत नाहीत. जे माध्यम ही नवोदित कवयित्री भावना अभिव्यक्त व्हायला वापरू पाहते, ते माध्यमच तिला तिच्या भावना दाबायला भाग पाडते.*
तर एका विद्यार्थीनीचा अनुभव तर त्याहून भयानक. एका राजकीय पक्षाचा युवा तालुका अध्यक्ष मेसेज करतोय,
'तू मला आवडतेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू मला हो म्हण, मी माझ्या शिवाय तुला कुणाची होऊ देणार नाही. मला ब्लॉक केलंस तर तर रस्त्यावर अडवून काय करतो बघच, बघू कोण मला अडवतो.' अशा धमक्यांवर धमक्या. कुणाशी बोलायची चोरी. सरांना, पालकांना, पोलिसांना सांगायला गेलं की सगळे आपल्यालाच दोष देऊन मोबाईल काढून घेणार एवढं नक्की.
प्रत्येकीचा अनुभव असा की फावल्या वेळेत जरा चॅटींग केलं, ओळख झाली की लगेच चिकटायला बघतात. कुठून येते ही मानसिकता?
एक सुप्रसिद्ध साहित्यिक, संपादक, व्यवसायिक, राजकीय युवानेते अशा समाजात व्हाईट आणि टाईट कॉलर मिरवणाऱ्या अनेकांचा डोळा सोशल मिडियातील 'ती'च्यावर असल्याचे लक्षात येते. ज्यांचा एक एक मेसेज तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारा, तिच्या एकाकीपणाचा फायदा घेणारा, तिच्या नात्यात विष कालवणारा, तिला अबला ठरवून चूरघळू पाहणारा आहे.
मग प्रश्न इथून सुरू होतात, तिनं फोन वापरायचा की नाही? तिनं सोशल मीडिया वापरायचा की नाही? तिनं ह्या अनुभवांना कसं तोंड द्यावं? तक्रार करायची तर कुणाकडे? समाज माध्यमांच्या या आभासी जगाने 'ती'च्या पुढे भलतंच वाढून ठेवलंय एवढं नक्की.
एका बाजूला समाज माध्यम हे तरूणाईचा आत्मविश्वास वाढविणारे परिवर्तनाचे साधन मानले जाते. तरुणाईमध्ये असलेलं नैराश्य, सततची चिंता आणि उदासिनता यांसारख्या मानसिक आजारावर उपाय म्हणून सध्या सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. असे असले तरी सोशल मीडियावर 'ती'च्याकडे दुय्यम, दुटप्पीपणे पाहून पुरूषी वरचष्मा कायम ठेवण्याचा प्रयत्न दिसतो.

- संदीप हरी नाझरे, आमणापूर ९७६६६८९४३३














अल्प परिचय :-
एम. ए.(इंग्रजी) , डिप्लोमा इन क्रिमिनल सायकॉलॉजी.
* जन्म दिनांक: २३/०६/१९८४.
मु. पो. आमणापूर , ता. पलूस, जि. सांगली.-४१६३०८
मधुभाष-९७६६६८९४३३
व्यवसाय- शेती, मुक्त पत्रकार. (एसबीएन मराठी पलुस तालुका प्रतिनिधी)
लेखन- चारोळी, कविता, कथा, अनुभव कथन, लेख , ललित, व्यंगचित्र,
प्रसिद्धी:-
* संपादक, 'स्वराज' दिवाळीअंक.
*'वज्रमुठ' कविता संग्रह प्रकाशित(२०१२)
VIRAL TRUTH'या लघुपटाची निर्मिती
गाव लयभारी', 'गावा पल्याड'  वेब सिरीज.
विनोदी कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर.
'कृष्णाकाठच्या पाऊलखुणा'ललित लेख संग्रह,  प्रकाशनाच्या वाटेवर....
* अक्षरवैदर्भी, अक्षरपेरणी,आरती , चपराक इ. वाडमयीन नियतकालिकातून  साहित्य प्रसिद्ध.
* पाक्षिक क्रांतिअग्रणीपर्व, सा.विशाल विटा , पाणिनी मुंबई मधून नियमित प्रसिद्धी.
*महाराष्ट्रातील तीसवर दिवाळी अंकातून साहित्य प्रसिद्धी.
* सांगली एफएम, कोल्हापूर एफएम, टॉमेटो एफएम, रेडियो सिटी इ.विविध रेडियो चैनल वरून साहित्य प्रसारित.
* दैनिक लोकसत्ता, तरूण भारत, सकाळ, लोकमत, पुढारी इ. वृत्तपत्रातून साहित्य प्रसिद्ध .
*प्रतिलिपी या संकेतस्थळावरही साहित्य उपलब्ध.
पुरस्कार:-
 'वज्रमुठ'कविता संग्रहासाठी उत्कृष्ट वाडमयाचा ,'परिवर्तन साहित्य पुरस्कार२०१२'
कृष्णाकाठ सोशल फौंडेशनच्या भिलवडीच्या वतीने कृष्णाकाठ साहित्य भुषण पुरस्कार 2016ने सन्मान
पुढारी दिवाळी अंक 2016च्या राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेत प्रथम
बळीराजा डॉट कॉम आयोजित विश्व स्तरीय काव्यलेखन स्पर्धेत  "बाप आता शेतात येत नाही" या कवितेस प्रथम   क्रमांकाचा पुरस्कार


2 टिप्‍पणियां:

  1. स्वतःचे अस्तित्व शोधताना होणारा कोंडमारा छान टिपला आहे लेखणीने

    जवाब देंहटाएं
  2. वाह छान!सोशल मिडियातलं वास्तव!
    👌💐💐

    जवाब देंहटाएं